यवतमाळ – मुख्याध्यापिकेने स्वतःच्याच शाळेत शिक्षक असलेल्या पतीचा शेकमध्ये विष देऊन खून केला. या हत्याकांडाचे अनेक कंगोरे आता उघड होत आहे. शिक्षिकेने विष तयार करण्यासाठी युट्यूबचा आधार घेऊन धोत्र्याचे देशी विषारी फळ आणि काही मेडिसीनचा वापर केला. मात्र जे फळ पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी शंकराला वाहते, त्याच फळाचा वापर पतीचा जीव घेण्यासाठी करण्यात आल्याने या मुख्याध्यापीकेविरोधात महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक लोहारा परिसरात असलेल्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुख्याध्यापिका असलेल्या निधी शंतनु देशमुख-तिवारी हिने प्रेम विवाहानंतर अवघ्या वर्षभरात आपल्या व्यसनी पतीची विष देऊन हत्या केली आणि आपण कोणताच गुन्हा केला नाही, या आविर्भावात चार दिवस समाजात वावरली. चौसाळा जंगलात गुरुवार, १५ मे रोजी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. घटनास्थळी कुठलेही पुरावे नसताना पोलिसांनी अवघ्या चार दिवसात या प्रकरणाचा छडा लावला. परिसरातील चौकात बसणाऱ्या तरुणांच्या चर्चेतून पोलीस या घटनेच्या तळापर्यंत गेले, हे विशेष. हा मृतदेह लोहारा परिसरातील शंतनू अरविंद देशमुख या तरुणाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र ही ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी अनेक क्लृप्त्या वापरल्या आणि पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहचू शकले.
अगदी सुरुवातीपासून या तपासात असलेल्या एका अधिकाऱ्याने ही घटना उजेडात येताच लोहारा, पिंपळगाव, वाघापूर या परिसरासह किटा कापरा, सावर या भागातील पारधी बेड्यांवर तपास केंद्रित केला. साधारणपणे पारधी बेड्यावर अशा घटना घडल्याची पार्श्वभूमी असल्याने हा मृतदेह कोणत्यातरी पारधी तरुणाचा असावा, अशी शंका पोलिसांना होती. लोहारा परिसरात चौकशीसाठी फिरत असताना एका चौकात उभ्या असलेल्या काही तरुणांना विचारपूस करताना गेल्या तीन, चार दिवसांपासून त्यांचा रोजच्या संध्याकाळच्या बैठकीतील एक मित्र येत नसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तो कोण, कुठला ही विचारपूस केली. तेव्हा शंतनू देशमुखचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन पत्नी निधी हिला विचारपूस केली, तेव्हा तो पुण्याला गेल्याचे तिने सांगितले. त्याचे मेसेज येतात, पण फोन बंद असल्याचे तिने सांगितले. त्यावरून पोलिसांनी शंतनुचे मित्र आणि पत्नी निधी यांच्यावर तपास केंद्रित केला. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या शर्टच्या तुकड्याशी मिळता जुळता शर्ट घालून शंतनु १३ मे रोजी त्याच्या मित्राला, सुजीत भांदक्कर याला भेटला होता. सुजितने तो शर्ट ओळखला आणि या हत्याकांडाचे बिंग फुटले.
अत्यंत थंड डोक्याने निधीने हे हत्याकांड घडविल्याचे आता स्पष्ट होत आहे. या हत्याकांडात निधीने आपल्या शाळेतील व शिकवणीसाठी येणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचा वापर केल्याने समाजात सर्व स्तरातून निधीवर संताप व्यक्त होत आहे. ही अल्पवयीन मुले निधीच्या जाळ्यात कशी फसली, याचा तपास पोलीस करत आहे. निधीने या मुलांना केवळ आयएएस होण्याचे स्वप्न दाखवून विश्वास संपादन केला होता की, त्यांना अन्य आमिष दाखवून त्यांच्याकडून मृतदेहाची विल्हेवाट लावली, याचा तपास सुरू आहे. कोवळ्या वयातील या मुलांना निधीने शारीरिक आकर्षण तर दाखवले नाही ना, अशी चर्चा आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त
या विधीसंघर्षग्रस्त बालकांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्यांच्या पालकांनी एकच हंबरडा फोडला. विश्वास संपादन करून शिक्षिकेनेच मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याने पालक संताप व्यक्त करत होते. या तिन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांनी निधीला फाशी सारखी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. या तिन्ही विद्यार्थ्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले असून, निधी देशमुख – तिवारी ही पोलीस कोठडीत आहे.