यवतमाळ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी यवतमाळ येथे संविधान चौकात तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आज दिल्ली येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली असून, ही कारवाई लोकशाही विरोधी व दडपशाहीची असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्नाविरोधात आंदोलनकर्त्यांनी संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. या निवेदनात राहुल गांधी व अन्य नेत्यांची अटक तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना लोकशाही पद्धतीने चर्चेतून उत्तर देण्याची आणि भविष्यात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये, याची हमी देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा जिल्हा व राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
मतांची चोरी करून भाजपाने सत्ता स्थापन केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला विचारलेले प्रश्न व आरोप सत्य असून, त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी राहुल गांधी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
या आंदोलनामुळे संविधान चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यात इतरही ठिकाणी काँग्रेसने आंदोलन करून निषेध नोंदविला.
या आंदोलनात यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भीसनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, ऍड. सीमा तेलंगे, ऍड. जयसिंग चव्हाण, राजू वीरखेडे, कॉ. सचिन मनवर, विजय देवतळे, विक्की राऊत, राजू चांदेकर, जुबेर सय्यद, शुभम शेंडे, ऋषभ गुल्हाने, स्नेहल रेचे, छोटू सवाई, विशाल पावडे, दत्ता हाडके, ओम तिवारी, असमत खान, जरार खान, गंगाधर राऊत, वासुदेव मानकर, अरविंद जाधव, अशोक पुसदकर, कैलास सुलभेवार, नईम पैलवान, किशोर गजभिये, मनोज पाचघरे, विजय मानेकर, शैलेश गुल्हाने आदींसह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.