यवतमाळ : जिल्ह्यात पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. आज मंगळवारी सकाळी सूर्यदर्शन झाल्यानंतर ११ वाजल्यापासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू झाली. गेल्या चार दिवसांत या पावसामुळे कुठेही जीवितहानी झाली नव्हती, मात्र आज कळंब तालुक्यात घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला.

कळंब तहसीलदार यांनी प्रशासनास दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आष्टी येथील सीताबाई वामनराव कलंबे यांचा आज मंगळवारी घराची भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ४५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने दीड हजार हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली आहे. ८३ घरांची पडझड झाली असून, दोन जनावरे वाहून गेली आहेत. सततच्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा – VIDEO : जेव्हा वाघाला पोटाची समस्या उद्भवते, तेव्हा…

मारेगाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका शेतकऱ्याने भावाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रमेश सूर्यभान बोकडे (४२, रा. वेगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी रमेश यांच्यावर राष्ट्रीयकृत बँकेचे तथा सोसायटीचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. याच चिंतेतून त्यांनी आज सकाळी शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सर्व घटकांचा विकास साधणारा अर्थसंकल्प – संजय राठोड

शेतकरी, महिला, तरुणांना केंद्रस्थानी ठेवतानाच नोकरदार, मध्यमवर्गीय, उद्योजक या सर्व घटकांना न्याय देणारा आणि देशाचा सर्वांगीण व समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. या अर्थसंकल्पामुळे देशाचा आर्थिक पाया अधिक मजबूत होईल, असा विश्वास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – मोठी घोषणा..! उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकार करणार १० लाखांपर्यंतची मदत

आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कररचनेत बदल करण्यात आल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. नैसर्गिक शेतीला बळ मिळणार आहे. शेतीशी निगडीत उत्पादकता, रोजगार, कौशल्यविकास, मनुष्यबळ विकास, सामाजिक न्याय, उद्योग, ऊर्जा या क्षेत्रांच्या विकासाचे निर्णय, यासोबोतच ५० लाख अतिरिक्त रोजगार, पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटींची भांडवली तरतूद या सर्व निर्णयांमुळे देशातील सर्व घटकांच्या विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थहीन ‘अर्थसंकल्प’ : माणिकराव ठाकरे यांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प अर्थहीन आहे. असंख्य पदवीधारक तरुण आज बेरोजगारीच्या झळा सोसत आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या दर दोघामागे एक बेरोजगार असल्याचे वास्तव पुढे आले आहे. आजच्या अर्थसंकल्पामध्ये कायमस्वरुपी नोकऱ्याबाबत कुठलीही ठोस घोषणा नसल्याने बेरोजगारांची निराशा झाली आहे. कृषिक्षेत्रासंदर्भात कुठलेही ठोस धोरण नाही. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन घोषणा करण्यात आल्या आहेत. सर्वांची निराशा झाल्याने केंद्राचा हा अर्थहीन अर्थसंकल्प असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.