अजित पवार यांची टीका

आजची तरुण पिढी समाज माध्यमांवर कार्यरत असली तरी राज्याचे राज्यकर्ते मात्र महाभारतात रममाण आहेत. मित्रपक्ष शिवसेना गुंडांचा मुख्यमंत्री अशी उपमा देतो. मुख्यमंत्री त्याला तावातावाने विरोधी पक्ष नेते असल्यासारखी उत्तरे देतात. त्यांच्याकडून जे शब्दप्रयोग केले जात आहेत, ते मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीला शोभणारे नाहीत, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी कार्यकर्ता मेळावा आणि त्र्यंबकेश्वर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी सत्ताधारी भाजप सध्या इतर पक्षातील उमेदवारांवर वेगवेगळ्या प्रकारे दबावतंत्राचा अवलंब करत आहे. पुणे व पिंप्री-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धमकावले जात आहे. भाजप सत्तेचा वापर करत विरोधकांना त्रास देत आहे. राष्ट्रवादीने सत्तेचा असा कधी गैरवापर केला नव्हता, अशी आठवण त्यांनी करून दिली.  भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव चर्चेत होते. परंतु, मुख्यमंत्रिपद फडणवीस यांना मिळाले. खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महसूलसह १२ खाती दिली गेली. भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा खडसेंना घरचा रस्ता दाखवत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले.  मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले. त्यांच्या कार्यशैलीचा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी धसका घेतल्याचे पवार यांनी सांगितले.  काही विशिष्ट अधिकाऱ्यांना चांगल्या जागा मिळतात, अनेकांना बाजुला सारले जात आहे. राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप केवळ भूमीपूजनाचा सपाटा लावते. नको ती आश्वासने दिली जातात. परवानग्या नसताना पंतप्रधान व मुख्यमंत्री प्रकल्पांचे भूमीपूजन करतात असेही त्यांनी सूचित केले.