धुळे: विधिमंडळ अंदाज समितीचा तीन दिवसीय धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौरा राजकीय पातळीवर चांगलाच चर्चेत आला असून त्यास कारण ठरले आहे धुळे येथील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत सापडलेले सुमारे एक कोटी ८४ लाख रुपयांचे घबाड. ही खोली विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने १५ मे पासून आरक्षित असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. या खोलीत आढळलेले कोट्यवधी रुपये नेमके कोणाचे, या खोलीत ते कसे आले, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात २३ मेपर्यंत दौरा आहे. या समितीत २९ आमदारांचा समावेश असून बुधवारी १० आमदार धुळे येथे दाखल झाले. ही समिती शासनाच्या विविध विभागांतर्फे झालेल्या कामांचा आढावा घेणार आहे.
धुळे येथील शासकीय गुलमोहर या विश्रामगृहात या समिती सदस्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली आहे. पैकी १०२ या क्रमांकाच्या खोलीत पाच कोटी रुपये ठेवले आहेत. हे पैसे समिती सदस्यांना देण्यासाठी ठेवण्यात आले आहेत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी सायंकाळी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
संबंधित खोलीबाहेर ठिय्या देत गोटे यांनी ही खोली वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात यावी, अशी मागणी करुन ठिय्या दिला होता. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. गोटे यांनी मागणी केल्यानंतर सहा तासानंतर अखेर रात्री पोलीस, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विश्रामगृहात दाखल झाले. त्यांनी पंचांसमक्ष खोलीचे कुलूप उघडले. या सर्व कार्यवाही आणि प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले.
अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे हे पथकासह उपस्थित झाल्यावर रात्री साडेअकरा वाजता खोलीची तपासणी सुरु झाली. खोलीत वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास एक कोटी ८४ लाख रुपयाची रोकड मिळाल्याचे सांगितले जाते. या रकमेमध्ये ५००, १०० आणि २०० रुपयांच्या चलनी नोटा आहेत. गुरुवारी पहाटे चार वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
गोटे यांच्या आरोपाप्रमाणे रक्कम पाच कोटी नसली तरी तब्बल एक कोटी ८४ लाख एवढी असल्याची माहिती मिळाल्याने ही रक्कम विश्रामगृहातील खोलीत कशी आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आम्ही जिल्हा दौऱ्यावर असून रात्री धुळे शासकीय विश्रामगृहावर गेलेलो नाही. संबंधितांनी केलेले आरोप निराधार असून त्यात काहीही तथ्य नाही. – अर्जुन खोतकर (अध्यक्ष, विधिमंडळ अंदाज समिती)