लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री जिल्ह्यातील यावल अभयारण्यासह मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्प आणि अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या गणनेत १३८ प्राण्यांची नोंद करण्यात आली. यावेळी जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे असलेल्या भागात मचाणी उभारून रात्रभर चंद्राच्या उजेडात प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. या गणनेत पट्टेदार वाघ, तरस, अस्वल, रानडुक्कर, रानससे, नीलगाई, लोधडी, चितळ, रानगवा, माकडे, हरीण, चिंकारा आदी प्राणी आढळले.

मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पासह यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात प्राणी गणना झाली. त्यात मुक्ताई व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघाचे, तर यावल अभयारण्यात बिबट्याचे दर्शन झाले. जंगलातील धरण, नद्यांसह बंधारे व कृत्रिम पाणवठ्यांजवळ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.

हेही वाचा… पाणीपुरवठामंत्र्यांच्या धरणगावमध्ये हंडाभर पाण्यासाठी वणवण; २२ दिवसांपासून नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणी गणनेत जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, धुळ्याचे वनसंरक्षक दिगंबर पवार, सहायक उपवनसंरक्षक उमेश बिराजदार, वन्यजीवचे वनरक्षक अधिकारी अमोल चव्हाण, प्रादेशिक विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, रावेर वनक्षेत्राचे सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, डोलारखेडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे हेमराज पाटील (चोपडा), चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे संकेत पाटील, अंकित पाटील (रावेर) आदींसह जळगावातील १० न्यायाधीशांचाही प्राणी गणनेत सहभाग होता