जळगाव – शहरातील समतानगर नागेश्वर कॉलनी भागात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. अरविंद गायकवाड हा चार वर्षांचा बालक रविवारी सायंकाळी इतर मुलांसोबत खेळत असताना, भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अरविंदवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे लक्षात येताच आजुबाजुच्या रहिवाशांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र. तोपर्यंत अरविंद रक्तबंबाळ झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा जागेवर मृत्यू झाला होता. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भटके कुत्रे आणून सोडणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच चार वर्षीय बालकाच्या मृत्युची जबाबदारी आयुक्तांनी घ्यावी, अशी मागणी केली. भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
नागेश्वर कॉलनीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जितेंद्र तावडे व इतर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बालकाच्या मृत्युनंतर संतप्त झालेल्या जमावाला शांत केले. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शहरातील विविध भागात बालकांसह ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरुष यापूर्वी अनेकवेळा जखमी झाले आहेत.
कुत्रे चावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. रस्त्यावरील कुत्रे वाहनाच्या मागे लागल्यानेही अनेक अपघात घडले आहेत. महापालिकेने मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तरीही मोकाट कुत्र्यांची संख्या आणि हल्ले कमी झालेले नाहीत. धक्कादायक प्रकार म्हणजे महापालिकेचे पथक पकडलेले कुत्रे शहराचाच एक भाग असलेल्या झोपटपट्ट्यांंमध्ये तसेच लगतच्या गावांमध्ये सोडून देतात. परिणामी, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कधीच कमी होत नाही.