जलसाठा ८० टक्क्य़ांवर; ५४९९ क्युसेसचा विसर्ग; गोदावरीच्या पातळीत वाढ
नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह चार तालुक्यांत सोमवारीही मुसळधार पाऊस कायम राहिल्याने परिसरातील जलसाठा उंचावत आहे. शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा सोमवारी ८० टक्क्य़ावर पोहचल्यानंतर दुपारी ५४९९ क्युसेसचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरीतील पाणी पातळी उंचावली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
दारणा, भावलीपाठोपाठ गंगापूर, पालखेड धरणातूनही पाणी सोडण्यात आले. नांदूरमध्यमेश्वरमधून ४५ हजार २३४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परंतु, जुलैअखेरीसही जिल्ह्य़ाच्या आठ धरणांमध्ये आजही जलसाठय़ाची स्थिती चिंताजनक आहे. सलग तीन दिवसांपासून जिल्ह्य़ातील चार ते पाच तालुक्यांत संततधार सुरू आहे. चोवीस तासात जिल्ह्य़ात एकूण ५१५ मिलीमीटरची नोंद झाली. त्यात सर्वाधिक २२६ मिलीमीटर पाऊस एकटय़ा इगतपुरीत झाला. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर (१००), सुरगाणा (७५), पेठ (६८) असे प्रमाण राहिले. दिंडोरी (३३), नाशिक (२९), कळवण (२२), मालेगाव (२०), बागलाण (१७), सिन्नर (१३) मिलीमीटर पाऊस पडला. उर्वरित नांदगाव, चांदवड, देवळा, निफाड, येवला तालुक्यात त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. रिमझिम स्वरूपात तिथे पावसाने हजेरी लावली.
अनेक भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही निवडक तालुक्यांतच तो कोसळत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा भागास पावसाने चांगलेच झोडपले. संततधारेमुळे परिसर जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातील भावली, दारणापाठोपाठ गंगापूर धरणही भरण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे उर्वरित भागातील धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही.
जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये सोमवारी २६ हजार ९३१ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. भावली, दारणा, वालदेवी, गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. गंगापूरमधून दुपारी एक हजार क्युसेसचा होणारा विसर्ग सायंकाळी साडेपाच हजार क्युसेसपर्यंत वाढविला गेला. आळंदी लवकरच तुडुंब भरून वाहू लागेल. पालखेडमधून दुपारी ४७०० क्युसेसचा विसर्ग करण्यात आला. दारणामधून १३ हजार ५८ तर भावलीमधून १५०९ क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून तब्बल ४५ हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे.
जलसाठा ४१ टक्क्य़ांवर
जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये सध्या २६ हजार ९३१ दशलक्ष घनफूट अर्थात ४१ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी याच सुमारास धरणांमध्ये ३६ हजार ५१२ दशलक्ष घनफूट अर्थात ५५ टक्के जलसाठा होता. यंदा तो १४ टक्क्य़ांनी कमी आहे. सात धरणांत ३० टक्क्य़ापेक्षा कमी पाणी आहे. तीन धरणे कोरडी आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत विलंब
गतवर्षी मुसळधार पावसामुळे गंगापूरचे दरवाजे १६ जुलै रोजी उघडावे लागले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने त्यास १३ दिवसांचा विलंब झाला. पावसाचे बदलते चित्र यातून अधोरेखित होत आहे.
तीन धरणे आजही कोरडीच
उर्वरित धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. करंजवण धरणात २७, तर वाघाडमध्ये ४५ टक्के जलसाठा आहे. ओझरखेडमध्ये पाच टक्के, पुणेगाव ११, भोजापूर २४, चणकापूर २५, हरणबारी २७, केळझर पाच, गिरणामध्ये आठ टक्के जलसाठा आहे. नागासाक्या, माणिकपुंज, तीसगाव धरण आजही कोरडेच आहे.