मनमाड: मुंबईतील २७ तासांचा मेगाब्लॉक संपल्यानंतर आता डिसेंबरमध्ये पुन्हा दोन दिवस रेल्वे प्रवाशांना मेगा ब्लॉकला सामोरे जावे लागणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ-जळगाव दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या तांत्रिक कामासाठी दोन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला असून पाच आणि सहा डिसेंबर रोजी या मार्गावरून धावणाऱ्या तब्बल ३८ प्रवासी रेल्वे गाड्या प्रशासनाने रद्द केल्या आहेत. तसेच १८ प्रवासी रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. दरम्यान, सततच्या ब्लॉकमुळे रद्द होणार्या गाड्यांमुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. मागील शनिवार आणि रविवार मुंबईतील ब्लॉकमुळे २७ रेल्वे गाड्या रद्द झाल्या असतांना आता पुन्हा ब्लॉक जाहीर झाल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. भुसावळ-जळगाव दरम्यान होत असलेल्या कामामुळे पाच डिसेंबर रोजी नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-नागपूर, एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस, अमरावती मुंबई-एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. हेही वाचा >>> नाशिक: डिसेंबरपासून शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती ; अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी पाऊल तत्पुर्वी म्हणजे चार आणि सहा डिसेंबरला नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे. जबलपूर-पुणे एक्स्प्रेस, तसेच पाच व सहा डिसेंबर रोजी देवळाली- भुसावळ शटल, भुसावळ-देवळाली शटल, भुसावळ- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या शिवाय अमृतसर-नांदेड ही गाडी चार व पाच तारखेला खंडवा, भुसावळ, अकोलामार्गे धावणार आहे. निजामुद्दीन अर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ही गाडी चार डिसेंबरला बिना, रतलाम, बडोदामार्गे धावणार आहे. रामेश्वरम-ओखा ही गाडी २५ नोव्हेंबर व दोन डिसेंबरला या दिवशी अंकाई, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसईमार्गे धावणार आहे. हेही वाचा >>> एकनाथ शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती – गुलाबराव पाटील यांच्याकडून पाठराखण आंदोलनाचा इशारा मध्य रेल्वेने पाच आणि सहा डिसेंबरला भुसावळ ते जळगाव दरम्यान घेतलेला मेगा ब्लॉक त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा रेल रोको आंदोलनाचा इशारा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) शहर शाखेने दिला आहे. याबाबतचे निवेदन महाप्रबंधकांना पाठविण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपरोक्त दिवशी देशभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबई-दादर चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जात असतात. याच काळात रेल्वेने मेगाब्लॉक घेऊन ३८ प्रवाशी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वेच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.