नाशिक : राज्यात आठवडाभरात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे त्या त्या जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पंचनाम्यांनुसार प्रस्ताव ठेवला जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी दिले.
जिल्ह्यात आठवडाभरापासून गारपिटीसह वादळी पाऊस सुरू आहे. प्रारंभीच्या दोन दिवसांत साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा व आंब्याचे प्रमाण मोठे आहे. रविवारी कृषिमंत्री कोकाटे यांनी सिन्नर मतदारसंघातील पांढुर्ली आणि चास येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पाऊस कोसळत होता. पांढुर्ली भागात रात्री ढगफुटीसारखा पाऊस झाला. शेतीसह रस्त्यांचे अतोनात नुकसान झाल्याकडे पंढरी ढोकणे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी लक्ष वेधले.
कोकाटे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. राज्यातील अनेक भागात पावसाने नुकसान झाले आहे. पंचनाम्याचे काम तातडीने पूर्ण करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत हे प्रस्ताव ठेवले जातील. शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली.