नाशिक – सध्या स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांपैकी काहींना आपले कर्तव्यही माहीत नाही. त्यांना केवळ आणून बसवले आहे. साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन, पादचारी आणि वाहनांना अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई, यासारखी साधी कामेही ते करीत नाहीत. शहरात हत्यांचे सत्र सुरू आहे, याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजीमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टिकास्त्र सो़डले.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. नाशिकला पालकमंत्री नसल्याने काहीही अडत नाही. कारण नियोजन, अंमलबजावणी करणारी यंत्रणाच असते. अधिकारी व्यवस्थित काम करणारे असायला हवेत. त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्वी कोणी चाकू हातात घेतला तर, गावभर चर्चा व्हायची. आता त्याची सवय झाली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांची भूमिका यात महत्वाची असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.

कुंभमेळा कामांच्या ठेक्याकडे अनेकांचे लक्ष

महानगरपालिकेच्या १६ हजार कोटींच्या सिंहस्थ आराखड्यावरून भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना नामोल्लेख न करता सुनावले. इतका निधी कोण देईल, असा प्रश्न केला. आगामी सिंहस्थासाठी नवीन वळण रस्त्यांचे नियोजन करण्यात आले. कधी भूसंपादन होईल, कधी निधी मिळेल, कधी काम होईल, हे माहिती नाही. मुळात अंतर्गत आणि बहिर्गत वळण रस्ते तयार आहेत. जिथे तो खराब असेल, तिथे दुरुस्ती करता येईल.

गोदावरी नदीची स्वच्छता केली तरी सिंहस्थ कुंभमेळा आपोआप चांगला होईल. फारसे काही करण्याची गरज नाही. नाशिक-त्र्यंबकेश्वर तसेच शिर्डीकडे जाणारा रस्ताही तयार आहे. गोदावरी नदीवर घाट तयार आहेत. ८० टक्के काम झाले असून साफसफाई व व्यवस्था उभारणीला प्राधान्य द्यायला हवे. परंतु, अनेकांचे लक्ष वेगवेगळ्या ठेक्यांकडे असल्याचा टोला भुजबळ यांनी हाणला.