लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : खाद्य पदार्थांचा स्वाद वाढविणारी कोथिंबीर सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सातत्याने होणाऱ्या पावसाने कोथिंबिरीचे नुकसान होत असल्याने शहरात घाऊक बाजारातील आवक निम्म्याहून अधिकने घटली आहे. परिणामी तिला सरासरी १७० रुपये जुडीपर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेता पुढील आठ ते १० दिवस भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे.

भाजीपाल्याच्या मुख्य घाऊक बाजारात म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संपूर्ण जिल्ह्यातून कोथिंबीर येते. समितीत लिलाव झाल्यानंतर व्यापारी माल मुंबईसह उपनगरे आणि गुजरातला पाठवतात. पावसात कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात होणारी नियमित आवक ६० ते ६५ टक्क्यांनी घटली असल्याचे व्यापारी मोहन हिरे यांनी सांगितले. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी बाजार समितीत २६ हजार ५०० जुड्यांची आवक झाली. यात गावठी कोथिंबीरला प्रति जुडी सरासरी १७० रुपये (किमान ३० ते कमाल २५१) तर संकरित कोथिंबीरला सरासरी १६० रुपये (किमान २५ ते कमाल २१५) दर मिळाले. पावसामुळे ओलसर माल लगेच खराब होतो. काही भागात पाऊस उघडल्याने आवक काहीअंशी सुरू झाल्याचे समितीचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-Video: नाशिकमध्ये फटाक्यांच्या गोदामाला आग, दोन जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक पातळीवर कोथिंबीरची आवक कमी असल्याने मुंबईसह इतरत्र माल पाठविण्यास मर्यादा आल्याचे व्यापारी सांगतात. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या पाच, सहा काड्या ४० ते ३० रुपयांना मिळत आहेत. अशा स्थितीत गृहिणींनी खरेदीत हात आखडता घेतल्याने अनेक घरातील भोजनातून कोथिंबीरला सक्तीची सुट्टी मिळाली आहे. पुढील काही दिवस ही स्थिती राहील. नंतर मात्र मोठ्या प्रमाणात आवक होऊन दर गडगडतील, असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे.