नाशिक : पंचवटीतील तपोवन मैदानात १४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता श्री बागेश्वरधाम सेवा समितीच्या वतीने बागेश्वरधामचे पिठाधीश्वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या उपस्थितीत “संत सभा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असताना अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. धीरेंद्रकृष्ण यांनी याआधी महाराष्ट्रातील संत, समाजसुधारकांचा अपमान केला असून अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या या कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न अंनिसने उपस्थित केला आहे.

श्री बागेश्वरधामच्या वतीने आयोजित संत सभेस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील साधू-संत, महंत आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाद्वारे समाजात अध्यात्म, भक्ती, आणि संस्कारांचा प्रसार करण्याचा श्री बागेश्वरधाम सेवा समितीचा उद्देश आहे. समितीने सर्व नाशिककरांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा…साधनांच्या पर्यायाने प्रचार साहित्य विक्रीवर परिणाम

तपोवन परिसरात संत सभेची तयारी सुरू असताना अंधश्रध्दा निर्मूलन समितीने कार्यक्रम रद्द करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे. धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे धर्माच्या आडून अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या अवैज्ञानिक व चमत्कारसदृश्य गोष्टींचे दावे करतात. भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य सर्रास नाकारून समाजात चमत्काराचा प्रचार, प्रसार करतात. लोकांच्या समस्यांवर दैवी तोडगेही सुचवितात. त्यामुळे समाजात अंधश्रद्धा फैलावण्यास मदत होते. महाराष्ट्राला थोर संत – समाजसुधारकांची, कृतीशील विचारसरणीची परंपरा आहे. अवैज्ञानिक, दैवी तोडगे आणि चमत्काराचे दावे करणारे धीरेंद्रशास्त्री यांनी यापूर्वी महाराष्ट्रात येऊन संत तुकाराम आणि इतर महापुरुषांबद्दल अवमानकारक भाषा वापरली असल्याचे अंनिसने म्हटले आहे.

हेही वाचा…गुजरातशी संलग्न बागलाण, इगतपुरी, कळवण, दिंडोरी खर्चविषयक संवेदनशील मतदारसंघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या अवैज्ञानिक आणि चमत्कारसदृश्य दाव्यांमुळे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट ,अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३ या कायद्याचे सर्रास उल्लंघन होते. असे असतानाही धार्मिकतेच्या नावाखाली त्यांना नाशिकमध्ये पुन्हा कार्यक्रम घेण्याची परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करुन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी अंनिसने केली आहे. धीरेंद्रकृष्ण यांनी त्यांचे चमत्काराचे दावे विज्ञानाच्या कसोट्यांवर सिद्ध करुन महाराष्ट्र अंनिसने ठेवलेले २१ लाख रूपयांचे पारितोषिक मिळवावे, असे लेखी आव्हानही देण्यात आले आहे. निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष समितीचे सचिव महेंद्र दातरंगे, वैभव देशमुख, अरूण घोडेराव, विजय खंडेराव आदींची स्वाक्षरी आहे.