लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्षा डॉ. शशीताई भगवान अहिरे (७६) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

सलग दोन दशके डॉ. शशीताई या जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा राहिल्या. संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी बँकेचा विस्तार केला. सहकार चळवळीतून सामान्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. महाराष्ट्र राज्य बँक फेडरेशनच्या त्या संचालिका होत्या. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन संघटनेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. मूळच्या अंबरनाथ येथील शशीताईचे शिक्षण पुण्यातील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात झाले. विवाहानंतर त्या दाभाडी (मालेगाव) येथे आल्या. रेणुकानगर पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आणि रेणुकानगर गृहनिर्माण संस्थेच्या उध्वर्यू म्हणून त्यांना ओळखले जाते. सहकार क्षेत्रासह अपंग विद्यार्थी, महिला, अनाथ मुले यांच्यासाठी त्यांनी काम केले. आळंदी येथील २०२१ मधील अधिवेशनात शशिताईंची सहकार भारतीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना नाशिक महानगरपालिकेने लोककल्याण पुरस्काराने गौरविले होते. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद, गिरजा महिला मंच, कलकी महिला गृहउद्योग, श्री गजानन महाराज सेवा संस्थेतर्फे शशिताईंना सन्मानित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-नाशिक : घरांसाठी त्र्यंबकमध्ये एल्गार संघटनेचा मोर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी सहकार चळवळीत समाजातील तळागाळातील जनतेला सामावून घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यासाठी शशीताईंनी आयुष्यभर प्रयत्न केल्याची भावना व्यक्त केली. माजीमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. शशिताई अहिरे यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक व सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.