नाशिक – निसर्गसौंदर्याने नटलेली वनराई …घनदाट वृक्षांची छाया…मुक्तहस्ते खळखळणारे धबधबे…खोल दऱ्या…चरणारी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…रानफुलांचा मंद मंद सुगंध…पर्यटकांसह भाविकांचीही मांदियाळी, अशा विविधांगाने नटलेला इगतपुरीजवळील कसारा घाट. अनेकानेक अंगांनी नटुन थटुन स्वागत करणारा कसारा घाट. हा घाट घाटन देवी मंदिराने अधिकच लक्षात राहतो. या महामार्गाने ये-जा करणारे अनेक वाहतूकदार घाटनदेवीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

इगतपुरी तालुक्याची ही ग्रामदेवता घाटनदेवी नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना सामान्य असून त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. या देवीचे स्थान घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये असल्याने देवीला घाटनदेवी, शैलपुत्री अशा नावांनी भक्त ओळखतात. मांगल्य ओतप्रोत भरलेल्या घाटनदेवीच्या दर्शनाने मनातील चांगले कार्य सिद्धीस जाते, असे भाविक सांगतात. मुंबईकडून येतांना सर्वांचे नाशिक जिल्ह्यात स्वागत करणारा कसारा घाट चढून आल्यावर अनेकांचे हात आपोआप घाटनदेवीला जोडले जातात. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जागरूकतेचे प्रतिक घाटनदेवीच्या चरणी भाविक नतमस्तक होतात. घाटनदेवी मातेची दोन मंदिरे इगतपुरीच्या घाटात आहेत.

अतिशय अवघड असलेल्या कसारा घाटात चालकांसह प्रवासीही जीव मुठीत धरून प्रवास करतात. हा प्रवास निर्विघ्न पार पडावा,  यासाठी चालकासह प्रवासीही मातेचे दर्शन घेत पुढील प्रवास करतात. नवरात्रोत्सवातील नऊही दिवस घाटनदेवी मातेचा  यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. आधीच नयनमनोहर असलेल्या मंदिर परिसरात नवरात्र उत्सवात आनंदाचे उधाण येते. घाटनदेवीच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून जातो. यात्रोत्सव काळात विविध विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने, रानफुलांच्या माळा,करमणुकीची रंगत वाढून मोठी गर्दी झालेली असते. नवरात्रीच्या काळात या दोन्ही मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मंदिराचा संपूर्ण परिसर कल्पना करता येणार नाही अशा निसर्ग सौदर्यांने वर्षभर फुललेला असतो.

एका आख्यायिकेनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली असता त्यावेळेस रस्त्यात देवीने या ठिकाणी विश्रांती घेतली. ती येथेच स्थिर झाली. तीच ही घाटनदेवी होय. देवीच्या मंदिराशेजारी वनविभागाने मोहुन टाकणारे निसर्ग माहिती केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात जिज्ञासु लोकांसाठी मोठा खजिनाच उपलब्ध आहे. जवळच अनेक  हॉटेल्स आणि पर्यटकांना निवासासाठी सुविधा आहेत. म्हणून या भागात वर्षभर पर्यटन करणारे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. एकदा कोणी पर्यटक आला तर त्याला पुन्हा येण्यास प्रवृत्त करणारे इथले वातावरण आहे.