मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढीवर हात फिरवला नसता तर संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते. राऊतांना ४१ मते शिंदेंनी दाढीवर हात फिरला म्हणून पडली, असा टोला शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे लगावला.
हेही वाचा- नाशिक : भातोडे शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची एनसीईआरटीकडून पडताळणी
हिंदू जनजागृती समिती, सकल जैन संघ, जिल्हा माहेश्वरी सभा, सनातन संस्था, वारकरी संप्रदाय, योग वेदांत सेवा समिती, हिंदू राष्ट्र सेना यांच्यातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनसंघर्ष मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, शिवतीर्थ मैदानावर आयोजित सभेत पालकमंत्री पाटील यांनी भाषणात राऊत यांना लक्ष्य केले. चार महिन्यांपूर्वी वेगळा मार्ग निवडल्यानंतर आमच्यावर खूप टीका टिपणी झाली. आम्ही सत्तेसाठी मार्ग बदलला नाही. सत्तेसाठी सतराशे साठ आणि आमच्यासाठी एकच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामुळे आम्ही हा मार्ग बदलला.
तिघांचे सरकार असते, तर आपण या व्यासपीठावर येऊ शकलो नसतो. बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. आता बाजूला भाजप आणि सनातन आहे. हिंदू असल्याचा सार्थ अभिमान आहे. खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. चांगले मुस्लीम बांधवही आमच्यासोबत आहेत. या देशात राहावयाचे असेल तर वंदे मातरम म्हणावेच लागेल. आम्ही कोणत्याही धर्माचा अनादर करीत नाही, असेही पाटील यांनी सांगितले. लव्ह जिहाद विरोधी कायदा, अवैध कत्तलखाने, गोवंश हत्याबंदी कायदा आणि श्री सम्मेद शिखरजी यासंदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार आणि पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.