नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीकडून नाशिक जिल्ह्याचा पिच्छा अजूनही सुरुच असून शनिवारी सायंकाळी शहरासह निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण  तालुक्यातील अनेक भागास वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. दिंडोरीतील मोहाडी, खेडगाव परिसरात प्रचंड गारपीट झाली. द्राक्षघड अक्षरश: तुटून पडले. काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या अवकाळीने कांदा, द्राक्षांसह अन्य कृषिमालाच्या नुकसानीचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. शहरात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली.

ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळीला तोंड द्यावे लागत आहे. मार्च महिन्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. एप्रिलच्या पूर्वार्धात त्याची पुनरावृत्ती कायम राहिली. आधीच कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात नव्याने भर पडत आहे. दोन ते तीन दिवस विश्रांती घेणाऱ्या अवकाळीने शनिवारी पुन्हा अनेक भागात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरूवात झाली. अनेक भागात गाराही पडल्या. बाजारपेठा व रस्त्यांवरील छोटे विक्रेते, पादचाऱ्यांची धावपळ उडाली. सखल भागात पाणी साचले. रामकुंड आणि पंचवटीतील मंदिरांत पूजा विधी व दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना पावसापासून बचावासाठी आसरा शोधावा लागला.

हेही वाचा >>> नाशिक : चेतन भगत, राजदीप सरदेसाई, दामोदर मावजो यंदाच्या वसंत व्याख्यानमालेचे आकर्षण; महाराष्ट्राची हास्यजत्राने समारोप

ग्रामीण भागात गारपीट आणि वादळी पावसाचा जोर अधिक होता. दिंडोरीतील मोहाडी आणि खेडगाव परिसरात प्रचंड गारपीट झाली. मोहाडी, साकोरे, कुर्णोली येथे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. सर्वत्र गारांचा खच पडला होता. गारांच्या माऱ्याने द्राक्षांचे घड तुटून पडले. एका झटक्यात सर्व होत्याचे नव्हते झाले. बागलाण तालुक्यातील मौजे तळवाडे दिगर, किकवारी खुर्द परिसर आणि चांदवड तालुक्यातील शिवरे, चिखलांबे येथे गारांसह पाऊस झाला. निफाडमधील काही भागात आणि मालेगावमधील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या बाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.

हेही वाचा >>> जळगाव : तलाठ्यासह कोतवाल लाच घेताना जाळ्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या द्राक्षाचा हंगाम ऐन भरास असून वारंवार नैसर्गिक संकट कोसळत आहे. वर्षभर जपलेल्या अनेक द्राक्ष बागांमध्ये काढणी सुरू आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वादळी वाऱ्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. सायंकाळी उशिरापर्यंत तो पूर्ववत झाला नव्हता.