नाशिक : आमदारांच्या बंडखोरीनंतरही जिल्ह्यातील शिवसेना जागेवरच असल्याचे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे दावे फोल ठरले असून खा. हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना पुन्हा फुटीच्या उंबरठय़ावर उभी ठाकली आहे. नाशिकच्या पक्ष संघटनेवर राऊत यांचे प्राबल्य आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर त्यांनी येथे शिवसैनिकांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. तथापि, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष संघटना डळमळीत होऊ लागल्याचे चित्र आहे.
खासदार गोडसे हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या गंजमाळ येथील कार्यालयासह निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक खासदाराच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या गोटात शांतता आहे. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची सेना कार्यालयात बैठक होऊन चर्चा झाली. परंतु त्याबद्दल माध्यमांशी बोलणे टाळले गेले. दुसरीकडे शिवसैनिकांनी समाजमाध्यमातून गोडसेंना लक्ष्य केले. अलीकडेच खा. संजय राऊत यांनी नाशिक येथे घेतलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात गोडसे अनुपस्थित होते. त्यांच्याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. अखेर ती खरी ठरली.
याआधी मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. भुसे आणि कांदे यांचे मतदारसंघ ग्रामीण भागातील असल्याने त्यांचे मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील व नाशिक शहरातील पक्ष संघटनेवर त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता. गोडसे शिंदे गटासोबत गेल्याने शिवसेनेसह खुद्द राऊत यांनाही हा धक्का आहे. कारण, राऊत यांच्याकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्रातील सेनेचे सर्वच आमदार आणि आता खासदारही शिंदे गटात गेल्याने इतर पदाधिकाऱ्यांमध्येही पडझड होणे अटळ मानले जात आहे.