नाशिक : करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाने ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. काही तांत्रिक बाबीमुळे एकापेक्षा अधिक वेळा ही रक्कम पाठवली गेली. तसेच मृताच्या जवळच्या एकापेक्षा अधिक नातेवाईकांनी प्रस्ताव पाठविल्याने राज्यात दुहेरी अनुदान वाटपाची २०५३ प्रकरणे निदर्शनास आली आहेत. त्यात जिल्ह्यातील १३७ प्रकरणांचा समावेश आहे. संबंधितांना रक्कम परत करावी लागणार आहे.

करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबातील नातेवाईकांना राज्य शासनाच्या वतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मात्र काही तांत्रिक बाबीमुळे काहींना ही रक्कम दोनदा पाठविण्यात आल्याचे उघड झाले. अशा प्रकरणांची पडताळणी जिल्हा प्रशासनाकडुन सुरू आहे. त्यात दोनदा आर्थिक मदत घेतल्याचे उघड झाल्यास या सर्व वारसांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे एकूण ६८ लाख ५० हजार रुपये परत द्यावे लागणार आहेत. ही रक्कम सरकारला परत न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील १३७ मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दोन वेळा मिळाले असल्याचा संशय प्रशासनाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाने, ज्या नातेवाईकांच्या बँक खात्यामध्ये एकापेक्षा अधिक वेळा अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे, अशा नातेवाईकांनी तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करावी, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. योजनेकरिता संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आलेल्या अर्जांची छाननी करुन अर्ज मंजूर करण्यात आल्यानंतर अर्जदारांच्या बँक खात्यात हे अनुदान बँकेमार्फत थेट जमा केले गेले. या प्रक्रियेत गोंधळ झाल्याने दोनदा अनुदान जमा झाले असल्याचे उघड झाले आहे.

गुन्हा दाखल झाल्यास शिक्षा किती?

खोटा दावा करून सानुग्रह साहाय्याची रक्कम मिळविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करावी, असे उपसचिवांनी सांगितले आहे. चुकीची अथवा बनावट माहिती देऊन शासनाचा निधी लाटल्याचे सिद्ध झाल्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक महानगरपालिका तसेच मालेगाव महापालिका आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवत पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – श्रीकृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नाशिक