नाशिक – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यात रात्री लागलेली आग बुधवारी दिवसभर धुमसत होती. ज्वलनशील साहित्यामुळे अल्पावधीत तिने रौद्रावतार धारण केला. अधुनमधून स्फोटासारखे आवाज येत होते. दोन कामगार जखमी झाले आहेत. आगीची तीव्रता इतकी आहे की, अग्निशमनच्या जवानांनाही समीप जाऊन तिच्यावर नियंत्रण मिळवणे अवघड ठरले. तब्बल १२ बंब आणि ४० जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. अडीच वर्षांपूर्वी याच कारखान्यात लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू तर, २२ कामगार जखमी झाले होते.
मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी तालुक्यात जिंदाल पॉलीफिल्म्स लिमिटेड हा प्रकल्प आहे. बीओपीपी आणि पीईटीसह विविध फिल्म्सचे उत्पादन या ठिकाणी होते. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास कारखान्यातील गोदामास आग लागली. ज्वलनशील फिल्म्स, रसायनांचा साठा असल्याने आग वेगाने भडकली. कारखान्यातील काही विभाग तिच्या विळख्यात सापडले. दिवसभर आग आणि धुराचे उंच लोळ दुरवरून दिसत होते. अधुनमधून स्फोटासारखे आवाज येत होते. आगीची तीव्रता इतकी आहे, की जवळून पाण्याचे फवारे मारणे अवघड ठरल्याचे मनपाच्या अग्निशमन दलाचे अधिकारी के. पी. पाटील यांनी सांगितले.
आग लागल्याचे लक्षात आल्यावर कामगारांनी रात्री सुरक्षित स्थळी धाव घेत आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित केली. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक महानगरपालिका, इगतपुरी नगरपालिका, महिंद्रा, बॉश आदींचे पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या सहसंचालक अंजली आडे, इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारावकर यांनीही धाव घेतली.
आगीचे स्वरुप पाहून आणखी पाण्याचे बंब मागविण्यात आले. तिचे स्वरुप पाहता ती आटोक्यात आणण्यास अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. आगीच्या कारणांची स्पष्टता झालेली नाही. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात तयार माल व साहित्य भस्मसात झाले असून नुकसानीचा अंदाज आग आटोक्यात आल्यानंतरच येईल, असे सांगितले जाते.
कामगार जखमी
धुमसणाऱ्या आगीत प्लास्टिक वितळून सर्वत्र पसरले. ते लक्षात येत नाही. अशाच ठिकाणी पाय पडून कारखान्यातील एक कामगार जखमी झाला. त्याचा पाय भाजला. अजून एक कामगार जखमी झाला आहे. जखमी कामगारांना जिल्हा शासकीय रुग्ण्लयात पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
आग नियंत्रणात येण्याविषयी अनिश्चितता
अडीच वर्षांपूर्वी म्हणजे २०२३ मध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या कारखान्यात गळती होऊन भीषण आग लागली होती. ती आग विझविण्यात तीन ते चार दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी दिवसभर प्रयत्न करूनही सायंकाळपर्यंत ती आटोक्यात आलेली नव्हती. आगीचे भयावह स्वरुप पाहता ती कधी आटोक्यात येईल, याबद्दल अनिश्चितता आहे.