नाशिक : नव्या सुधारित आकृतीबंधात रद्द झालेली वर्ग चारची पदे पुन्हा निर्माण करावीत, वर्ग तीन आणि वर्ग चारच्या सर्व कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे जोपर्यंत विनाअट समायोजन होत नाही. तोपर्यंत मागील सत्रात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना रोजंदारी पध्दतीनेच आदेश देण्यात यावेत, यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा मंगळवारी रात्री उशीरा स्थगित झाला.

महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने चांदवड येथील सोग्रस फाट्यापासून आदिवासी आयुक्त कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला होता. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील वर्ग तीन आणि वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांच्याविरोधी २१ मे रोजी घेण्यात आलेला बाह्यस्त्रोतद्वारे शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्या बैठकीत मान्य न झाल्याने संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा आडगाव येथील ट्रक टर्मिनलजवळ आला असता आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेतली. डाॅ. उईके यांच्या आवाहनानंतरही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी मंत्री डॉ. उईके यांच्याबरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महाजन यांनी आंदोलनकर्त्यांना पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करुन मागील सत्रात हजर असलेल्यांना कामावर रुजू करण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. बुधवारी आंदोलनकर्ते घरी परतण्यास सुरूवात झाली.