नाशिक – जिल्ह्यात सहा लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा होणार आहे. शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, राष्ट्रीयकृत बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा, खतांबरोबर इतर वस्तू घेण्याची (लिकिंग) सक्ती करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करावेत, आदी सूचना कृषिमंत्री ॲड माणिक कोकाटे यांनी येथे दिल्या. बैठकीस लाभक्षेत्र विकास व महावितरणचे अधिकारी गैरहजर राहिल्याने संतप्त कृषिमंत्र्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे. एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, अशी दक्षता घ्यावी. पणन विभागाने सुविधा केंद्रांचे तातडीने अद्ययावतीकरण करावे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी अग्रणी बँक व सहकार विभागाने लक्ष द्यावे, असे कोकाटे यांनी सूचित केले.

जिल्ह्यात रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रारुप आराखडा करावा. रेशीम लागवडीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले. आमदार हिरामण खोसकर यांनी कृषी विभागाने दुर्गम, आदिवासी भागात आंबा लागवड, रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर यांनीही सूचना केल्या.

बी- बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी, याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी सांगितले. जिल्ह्यात विभागस्तरावर दोन, जिल्हास्तरावर सहा, उपविभागस्तरावर आठ आणि तालुकास्तरावर ३० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषिमंत्र्यांचा संताप

बैठकीत महत्वाच्या विभागाचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित होते. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला त्या त्या भागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. अन्यथा संबंधितांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल पाठवण्याचा इशारा कृषिमंत्र्यांनी दिला. शेततळेधारक शेतकऱ्यांना सौर कृषीपंप मिळण्यात अडचणी येत आहेत. याबाबतची माहिती बैठकीत उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना देता आली नाही. त्यामुळे संतापलेल्या कोकाटे यांनी बैठकीतून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. मागेल त्याला शेततळे मग मागेल त्याला सौर पंप का नाही, असा प्रश्न केला.