नाशिक – पूर्ववैमनस्यातून परस्परांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार शहरात महामार्गावरील इनायत कॅफे हॉटेल परिसरात घडला. या बाबतची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित होताच शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन्ही गटातील चौघांना अटक केली. यात दोन महिलांचाही समावेश आहे.
रोहित गोरडे, मयुरी गोरडे (दीक्षित चाळ, भद्रकाली), ऐश्वर्या भुजंग (मुंबईनाका) आणि दिगंबर उर्फ दत्ता आंधळे (कलानगर, दिंडोरी रोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दीपक कपिले ( ३५, रविवार कारंजा) या युवकाने तक्रार दिली. त्यानुसार रविवारी रात्री संशयित गोरडे याच्या पत्नीने त्याच्याशी संपर्क साधला होता. पतीसह आम्ही तीन महिला इनायत कॅफे या हॉटेल परिसरात मद्यपान करीत असताना एकीचा नवरा तेथे आला. तो मैत्रिणीस बेदम मारहाण करीत असल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे कपिले हा मित्र दत्ता आंधळे यास बरोबर घेऊन इनायत कॅफे भागात गेला असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे.
तर मयुरी गोरडे या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार इनायत कॅफे या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो असता कपिले याने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात बोलावून घेत पतीवर जिवघेणा हल्ला केला. यात पतीला गंभीर दुखापत झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनिटचे हवालदार प्रशांत मरकड आणि पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरडे दाम्पत्यास शिवशक्ती चौक भागात अटक करण्यात आली. तर अन्य महिलेस जुन्या तांबटलेन भागातून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई सुरू असतानाच पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या गटातील दत्ता आंधळेला चोपडा लॉन्स भागात अटक करण्यात आली. संशयितांना मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, चेतन श्रीवंत आदींच्या पथकाने केली.