नाशिक : सटाणा शहरातील वाहतूक कोंडीतून शहराला कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या शहर बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहर बाह्यवळण रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नंतर रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे.
याबाबतची माहिती सटाण्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. सटाणा शहर बाह्यवळण रस्त्याप्रश्नी मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे यांचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्या अंतर्गत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांची भेट घेतली होती. सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रलंबित असल्याने या महामार्गावर शहरात दररोज वाहतूक कोंडी होत असते. गेल्या काही वर्षात मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सटाणा शहराला बाह्यवळण रस्ता व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु, या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील जाहीर सभेत केंद्रीय महामार्ग रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीनंतर तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यास सहा महिन्यांचा कालावधी लोटला, तरी कामाबाबत हालचाल होत नव्हती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे यांनी या बाह्यवळण रस्त्याप्रश्नी थेट दिल्ली गाठत केंद्रीयमंत्री गडकरी यांची भेट घेतली. दिल्ली येथील जंतरमंतरवर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांची भेट घेतली. शेवाळे यांनी सटाणा शहर बाह्यवळण रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) संदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. डीपीआर सल्लागाराच्या नियुक्तीनंतर बाह्यवळण रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम तात्काळ सुरू होणार असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया होऊन बाह्यवळण रस्त्याच्या कामाची सुरुवात होईल, असेही मोरे यांनी म्हटले आहे.