नाशिक – सातत्याने सुरू असलेल्या वादळी पावसामुळे शहर, परिसरातील अनेक भागात विद्युत यंत्रणेवर झाडे, फांद्या कोसळल्याने महावितरणच्या व्यवस्थेला फटका बसला. परिणामी, उच्च दाबाच्या वाहिन्या तसेच रोहित्रांचा वीज पुरवठा खंडित झाला. बंद झालेली वीज यंत्रणा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर महावितरणचे अभियंते आणि जनमित्रांनी टप्याटप्य्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम केले. सोमवारी वादळी पावसात पुन्हा अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू राहिला.

आठवडाभरापासून वादळी पावसामुळे वीज यंत्रणेचे नुकसान होत आहे. रविवारी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे खांब कोसळले, वीज वाहिन्या तुटल्या. विद्युत यंत्रणेवर मोठी झाडे पडल्याने पुरवठा खंडित झाला. तिबेटीयन मार्केटजवळ असलेल्या सातपूर विद्युत उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व ११ केव्ही वाहिन्यांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला. यामध्ये प्रामुख्याने कॉलेज रोड, गंगापूर रोड, एबीबी चौक, सिटी सेंटर मॉल, उंटवाडी या भागातील बाधित पुरवठा रविवारी टप्प्याटप्प्याने रात्री उशिरापर्यंत पूर्ववत करण्यात आला. याशिवाय कामटवाडे परिसरातही बंद झालेला वीज पुरवठा महावितरणने अविश्रांत कार्य करीत सुरू केला.

सोमवारी पुन्हा दुपारी आलेल्या पावसाने आणि हवेमुळे झाडे पडून वीज पुरवठा खंडित झाला. कॉलेज रोड, गंगापूर रोड, पंचवटी, संजयनगर, हिरावाडी, विनय नगर, पेठ रोड, दिंडोरी रोड या भागात तसेच शासकीय रुग्णालयाजवळील विद्युत उपकेंद्रात झाड पडल्याने तेथील वीज पुरवठा दीड तास खंडित झाला होता, झाड बाजूला करून कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा तत्काळ सुरू केला. खांब कोसळल्याने सीबीएस, जिल्हा न्यायालय, ठक्कर बाजार, कॅनडा कॉर्नर, मुंबई नाका, चांडक चौक व परिसर या भागात वीज पुरवठा बंद झाला. इतरत्र वीज पुरवठा सुरळीत असल्याचा दावा महावितरणने् केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य सातत्याने सुरु असून महावितरणचे अभियंते, जनमित्र व कंत्राटदाराचे कामगार यांनी वीज यंत्रणेवर पडलेली झाडे बाजूला करून तुटलेल्या तारा दुरुस्त केल्या. शहरातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.

महावितरण नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंते चेतन वाडे आणि जगदीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंते व जनमित्र सातत्याने कार्य करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३३४३५/ १८००२१२३४३५ / १९१२ यावर तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.