नाशिक – पुण्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, शहर व ग्रामीण भागातील सर्व पूल, जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण करावे, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पावसाळ्यात पर्यटकांनी जोखमीच्या ठिकाणे जाणे टाळावे, धोकादायक आणि प्रतिबंधक क्षेत्रात पाण्यात उतरू नये. अशा ठिकाणी छायाचित्रे, सेल्फी काढणे टाळावे. पर्यटनस्थळी सूचना फलक लावावे, आवश्यक तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करावा, असे सूचित करण्यात आले आहे.
पुण्याजवळील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू तर सुमारे ५० जण जखमी झाले होते. पावसाळ्यात नाशिकमधील पर्यटनस्थळी यापूर्वी काही दुर्घटना घडल्या आहेत. हे लक्षात घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी पर्यटक, पर्यटनस्थळांची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांना सूचना केल्या आहेत. प्रतिबंधित धरणे, धबधबे, निसरडी ठिकाणे, जलाशये तसेच ज्या क्षेत्राची माहिती नाही, तिथे जाणे टाळणे गरजेचे आहे. पर्यटनासाठी जाताना मार्गदर्शकाची मदत घ्यावी. पाण्याच्या ठिकाणी पोहता येत असेल, तरीही लाइफ जॅकेट घालावे. योग्य ती साधनसामग्री तपासून काळजी घेऊनच पाण्यात उतरावे. शिस्त पाळून सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक आपत्कालीन संपर्क क्रमांकासह संबंधित विभागांनी आपापल्या अधिपत्याखालील ठिकाणांवर लावावेत. धोकादायक ठिकाणी सेल्फी, छायाचित्रे काढू नये, याची माहिती द्यावी.स्थळांच्या क्षमतेनुसारच पर्यटकांना प्रवेश देण्याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
गर्दी व्यवस्थापनाची सूचना
पावसाळ्यात अनेक टिकाणी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जातात. ती योग्य प्रकारे चालविणे आणि उभी करणे गरजेचे आहे. जेणेकरून वाहतूक कोंडी वा अपघात टाळता येतील. काही पर्यटनस्थळांवर सुटीच्या दिवशी मोठी गर्दी उसळते. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी संबंधित विभागाने स्थळ-विशिष्ट योजना तयार करून अंमलात आणावी. रुग्णवाहिका व तत्सम व्यवस्था अपघातप्रवण पर्यटन स्थळांजवळ त्वरित उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
अनधिकृत जाहिरात फलक हटवा
शहर आणि निमशहरांमध्ये उभारलेले मोठे जाहिरात फलक दुर्घटनांचे कारण ठरू शकतात. या सर्व फलकांसह पुलांचे संरचनात्मक परीक्षण झाल्याची खात्री करावी, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सूचित केले आहे. वादळी वाऱ्यात जाहिरात फलकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे, विनापरवानगी लावलेले फलक हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पर्यटनस्थळी पोलीस बंदोबस्त
पावसाळ्यात अनेक पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी, गोंधळ होतो. मद्यपान करून काही जण गोंधळ घालतात. पोलिसांना आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणांच्या परिसरात सुरक्षित क्षेत्र स्पष्टपणे निश्चित करून कुंपण किंवा सीमारेषा दर्शवावी. यंत्रणांनी आपल्या हद्दीत जीवरक्षक, सर्पमित्र, स्वयंसेवक, गिर्यारोहक तसेच आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचाव कार्यात मदत करू शकणाऱ्या व्यक्तींना सहभागी करून घ्यावे, असे शर्मा यांनी म्हटले आहे.