नाशिक -नवरात्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. श्रध्दा आणि भक्तीचा संगम. उत्सव काळात अनेकांकडून विशेषत: महिला वर्गाकडून उपवास केले जातात. बऱ्याचदा उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाणा, भगर, शेंगदाणे यासह गोड पदार्थांवर भर दिला जातो. मात्र यामुळे अनेक वेळा आरोग्यविषयक तक्रारी सुरु होतात. त्यामुळे उपवास बाजूला राहून दवाखान्याच्या फेऱ्या मारणे सुरु होते. या पार्श्वभूमीवर महिलांनी नवरात्र उत्सवात आरोग्य कसे सांभाळावे, याविषयी वैद्यकीय वर्तुळातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

नवरात्र म्हणजे गरबा, दांडिया. तसेच उपवास. अनेक भाविक श्रध्देने नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काही एकाच वेळा फराळ करतात, काही पाणी तर काही दुधाचे सेवन करतात, एकाच धान्याचा आहार घेणे, विशिष्ट भाज्यांचे सेवन करणे अशाही पध्दतीने हा उपवास होतो. परंतु, उपवासात खाण्याच्या वेळा बदलतात, तसे ताटातील खाद्यपदार्थही. दैनंदिन कामाचा ताण, कामाच्या वेळा या मध्ये उपवासातील खाद्यपदार्थामुळे काहींना डोकेदुखी, मळमळ, चक्कर असा त्रास सुरु होतो. काहींच्या शरीरातील पाणी कमी होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असल्याने दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने खात राहणे गरजेचे आहे.

उपवासादरम्यान जड पदार्थांऐवजी हलके पदार्थ तसेच फळांचा रस घेणे आवश्यक आहे. उपवास असला तरी भाविकांनी आरोग्याकडे बिल्कूलही दुर्लक्ष करु नये, काळजी घ्यावी असा सल्ला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील आहारतज्ज्ञ डाॅ. रंजिता शर्मा यांनी दिला आहे.

नवरात्र उत्सवाचा आनंद घेतांना शारीरिक श्रम कमी करावेत. उपवासातील खाद्य पदार्थांमध्ये साबुदाणा, भगरऐवजी अन्य काही पर्यायांचा विचार व्हायला हवा. नवरात्र उत्सवात खरे तर नऊ दिवसांचा आहार आराखडा पाळण्याची गरज आहे. यामध्ये एक ग्लास पाणी, त्यात अर्धा लिंबु, १० मिली रस घ्यावा. सफरचंद सायडर व्हिनेगर, २०० मिली कोमट पाण्याबरोबर घ्यावे. सुकामेवा, ग्रीन टी, फळे, नारळाचे लाडु, मिल्क शेक, शेंगदाण्याचे लाडु, मखना, रायता, उकडलेले बटाटे, सुरण भाजी, दही आदी पदार्थ खावेत. साबुदाण्याचा अतीवापर टाळावा. उपवासात जास्त प्रमाणात चहा आणि कॉफीचे सेवन करू नये. नवरात्र उत्सवात मिठाचा वापर कमी करावा. तळलेले पदार्थ टाळावेत. हे पदार्थ पचण्यासाठी अवजड असतात. तसेच बाहेरील गोड पदार्थांचे सेवन कमी करावे. यामध्ये घरी राजगिरा शिरा, शेंगदाणा शिरा, राजगिरा लाडु, खजुराचे लाडु खावेत. रात्री पुरेशी झोप घ्यावी. हलका व्यायाम करावा तसेच पाणी पित राहावे. जेणेकरुन तब्येतीला कोणताही त्रास होणार नाही, असे आहारतज्ज्ञ डाॅ. रंजिता शर्मा यांनी सांगितले.