नाशिक : केंद्र सरकार देशातील जनतेच्या नव्हे, तर अदानी-अंबानींसारख्या काही निवडक भांडवलदारांच्या हितासाठी कार्यरत आहे. सामान्य जनतेचे प्रश्न, रोजगार, महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे हक्क, यांच्याकडे सरकारने जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. आज ज्या पद्धतीने एका व्यक्तीला राष्ट्राच्या रूपात मांडले जात आहे, ते हिटलरवादी फॅसिझमवादाचे लक्षण आहे, अशी टीका करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
येथे रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २५ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात झाली. संमेलनस्थळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उदघाटन सत्रात प्रमुख वक्त्या अमरजीत कौर यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांसह आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर मत मांडले. भांडवलशाही देश जगभरात युद्धजन्य स्थिती निर्माण करून आपली शस्त्रे विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. इस्रायल विरुध्द पॅलेस्टाईन संघर्ष, अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले हे त्याचे उदाहरण आहे. भारतही या युद्धखोरांच्या बाजूने उभा राहिला असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आणि शांततेच्या तत्त्वांशी हे पूर्णतः विसंगत आहे. सरकार हे देश नसते. नेता देश नसतो, असे कौर यांनी सांगितले.
पक्षाचे राष्ट्रीय सचिव डाॅ. भालचंद्र कांगो यांनी अध्यक्षीय भाषणात पक्षाच्या संघर्षशील इतिहासाची उजळणी केली. कम्युनिस्ट पक्ष समाजातील सर्व घटकांसाठी लढत आला आहे. प्रस्थापित सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुध्द संघर्ष हीच आमची परंपरा आहे. शोषणमुक्त समाजाच्या स्वप्नासाठी आमचा लढा कायम राहील, असे त्यांनी नमूद केले. राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे, सहसचिव राजू देसले यांचीही भाषणे झाली. अधिवेशनाआधी शहरातील अशोकस्तंभपासून दुचाकी तसेच व्दारका चौकापासून पायी फेरी काढण्यात आली. ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन (एआयएसएफ) संचलित लाल पथक या ढोल पथकाचे सादरीकरण हे या फेरीचे वैशिष्ट्ये ठरले.