नाशिक – मंगळवारी दुपारी पावसाने काहिशी उघडीप घेतल्याने शहर, परिसरात सूर्यदर्शनही घडले. मागील काही दिवसांपासून झालेल्या संततधारेने जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांमधील जलसाठा २६ हजार २४६ दशलक्ष घनफूट म्हणजे ४० टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्के अधिक पाणी आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूरमधील विसर्ग कमी करून ४४०० क्युसेकवर आणण्यात आला. दारणा, कडवा, नांदूरमध्यमेश्वर या धरणांमधूनही पाणी सोडण्यात आले आहे.

हंगामाच्या पहिल्या महिन्यात जलसाठा इतका उंचावण्याची आणि काही धरणांमधून पाणी सोडावे लागण्याची ही अपवादात्मक घटना आहे. मागील वर्षी याच काळात जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच हजार ६३ दशलक्ष घनफूट म्हणजे आठ टक्के जलसाठा होता. या वर्षी सातत्याने चाललेल्या मुसळधार पावसाने तो गतवर्षीपेक्षा २१ हजार दशलक्ष घनफूटने अधिक आहे.

इगतपुरी आणि मालेगावचा अपवाद वगळता उर्वरित १३ तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्याने धरणसाठा उंचावला. धरण परिचालन सुचीनुसार जून महिन्यात धरणात किती जलसाठा ठेवायचा, हे निश्चित असते. काही धरणांनी ती पातळी ओलांडल्याने विसर्ग करण्यात आला. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ६२ टक्क्यांवर गेल्याने सलग तीन दिवसांपासून धरणांतून विसर्ग होत आहे. पावसाने उघडीप घेतल्याने हे प्रमाण काहीसे कमी करून ४४०० क्युसेकपर्यंत आले. या दिवशी दारणातून ४७४२, कडवा १०६० आणि नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५७७५ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणनिहाय जलसाठा

गंगापूर ३४५५ दशलक्ष घनफूट (६२ टक्के), काश्यपी ९३६ (५१), गौतमी गोदावरी ६१४ (३३), आळंदी ३२४ (४०), पालखेड ४८१ (७४), करंजवण १४५८ (२८), वाघाड ६१८ (२७), ओझरखेड ६३२ (३०), पुणेगाव १५१ (२५), तिसगाव ४२ (१०), दारणा ४०९१ (५८), भावली १०१६ (७१), मुकणे ३५३५ (४९), वालदेवी ५२१ (४६), कडवा ७८१ (४७), नांदूरमध्यमेश्वर ८४ (३३), भोजापूर २५७ (७२), चणकापूर ९९१ (४१), हरणबारी ३७१ (३२), नागासाक्या २९ (सहा), गिरणा ४९०५ (२७). पुनद ५८४ (४५), माणिकपुंज ७० दशलक्ष घनफूट (२१ टक्के) असा जलसाठा आहे.