धुळे – भ्रमणध्वनीवर आलेल्या चुकीच्या संदेशाची खात्री न करता आपण त्यावर सलोखा बिघडविणारी प्रतिक्रया देतो. तेथूनच शहरातील शांततेला गालबोट लागते. सण, उत्सव काळात शहराची शांतता बिघडविणाऱ्या समाजकंटकांना, दंगेखोरांना पोलीस प्रशासनाकडून कठोर शासन केले जाईल, असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिला.
हेही वाचा – जळगावात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना; पोलिसांकडून शांततेचे आवाहन
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. जे घडलंच नाही ते दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. अफवा पसरविल्या जातात. जे सांगितले जाते, त्याचा अपभ्रंश केला जातो. समाजमाध्यमांवर अशा परिस्थितींमध्ये टाकण्यात आलेले ९९.९९ टक्के चित्रफिती, संदेश खोटे असतात. फेसबुकवर खोटे खाते उघडले जाते. असे संदेश पुढे पाठविण्यापूर्वी त्याची पडताळणी होणे गरजेचे आहे, असे शेखर यांनी सांगितले. कुठेतरी काहीतरी होतं. आणि आपण धुळे जाळायला निघतो, मालेगाव जाळायला निघतो. प्रत्येकाने आपल्या समुदायातील तरुणांचे समुपदेशन करावे, कायदा हातात घेतला तर हातात बेड्या पडतील हे ध्यानात ठेवा. अशांतता पसरविण्यामागे जे सूत्रधार असतील त्यांना सोडणार नाही. दंगे करून धुळ्याचे नाव बदनाम होईल हे खपवून घेणार नाही. अनेकजण वादग्रस्त, शांतता बिघडविणारे संदेश पाठवून नंतर उडवितात. परंतु, आमच्याकडे त्याची नोंद असते. धुळे हे शांत आणि चांगले शहर आहे. एकादशी आणि ईद शांततेत, उत्साहात साजरी करा. शहराची शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेखर यांनी केले.