लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: रेल्वेच्या मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या तृतीयपंथीयांना इगतपुरी येथे शस्त्राचा धाक दाखवून हप्ता वसुली करणाऱ्या दोन गुन्हेगारांना पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाठलाग करून पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील एक जण पळून गेला.

रविवारी इगतपुरी बस स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी गाड्यांमध्ये भिक्षा मागणारे तृतीयपंथी बसलेले होते. यावेळी या ठिकाणी तीन युवक कोयता आणि धारदार शस्त्र घेवून आले. प्रत्येक तृतीय पंथीयास शस्त्राचा धाक दाखवून हप्तावसुली करत होते. आज धंदा झाला नाही, उद्या देतो, अशी विनवणी तृतीयपंथीयांकडून करण्यात येत होती. परंतु, युवक ऐकायलाच तयार नव्हते. त्यांनी शस्त्राचा धाक दाखविल्याने तृतीयपंथी भयभीत झाले होते. याच वेळी गस्त घालणाऱ्या पोलीस वाहनात बसलेले निरीक्षक राजु सुर्वे यांची नजर त्यांच्याकडे गेली असता शस्त्रधारी युवकांनी पळ काढला. निरीक्षक सुर्वे यांच्यासह पथकाने पाठलाग करुन दोन युवकांना ताब्यात घेतले.

आणखी वाचा- जळगाव: नोकरीचे आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

यावेळी घटनेतील तृतीय पंथीयांकडे चौकशी केली असता हप्ते वसुलीचा प्रकार उघड झाला. या घटनेत तक्रारदार सुगंधा गायकवाड (३८, रा. पत्रीपूल झोपडपट्टी, कल्याण पूर्व) यांनी जीवे मारण्याची धमकी व हप्ता वसुलीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेतील संशयित गुन्हेगार सूरज भंडारी, गोपीचंद भंडारी (नांदगाव सदो, इगतपुरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. काही महिन्यांपूर्वी इगतपुरीत डेव्हिड गँग आणि भंडारी यांच्यात हप्ता वसुलीच्या वादावरून शहरात दोन्ही गँगमधील दोन जणांचा खून झाला होता.

या घटनेवरून मागील काही गुन्ह्यांची कबुली देत दोन संशयितांनी सर्व माहिती पोलिसांना देताच तपास चक्राला गती आल्याने शहर व नांदगाव सदो येथील मोठी हप्ता वसुली टोळी ताब्यात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांना गुंड पुरवून धाक जमवित हाणामारी, लुटालुट आणि हप्ता वसुली करून सर्वसामान्य जनतेला व महिला, मुलींना त्रास देत या गँगने जेरीस केले होते. नव्याने आलेले पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी खाकीचा धाक निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याने गुंडांचे धाबे दणाणले आहे. धारदार शस्त्र बाळगणारे व गुंड प्रवृत्तीचे रिक्षाचालक आदींनी सर्वसामान्य जनतेला किंवा महिला, मुलींना, ज्येष्ठ नागरीकांना नाहक त्रास दिल्यास इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन निरीक्षक सुर्वे यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण ते इगतपुरी रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथी, पाणी बाटली व खाद्य पदार्थ विक्री करणारे सुमारे ४०० जण कायम व्यवसाय करतात. या प्रत्येकांकडून ५०० रुपये हप्ता आठ दिवसाला जमा केला जातो. ही रक्कम लाखो रुपयात जमा होते. याचे वाटप प्रत्येक गुंड आपल्या धाक व दराऱ्याप्रमाणे ठरवितो. या कारणामुळे आपसात भांडण होवून प्रकरण खुनापर्यंत पोहचते. त्यामुळे या गुंडांनाच संपवणे शहराची गरज आहे. -राजू सुर्वे (पोलीस निरीक्षक, इगतपुरी)