नाशिक : दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला सोसायटीत दोन कोटी ३९ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन दाखल गुन्ह्यात तब्बल १७ महिन्यानंतर तीन संशयितांना अटक करण्यात करण्यात आली. संशयितांना न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भात शासकीय लेखा परीक्षक विष्णू वारुंगसे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार डिसेंबर २०२३ मध्ये वणी पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १६ वर्षात सभासदांनी परत केलेल्या कर्जाची संस्थेच्या दप्तरी नोंद न करता त्यांच्याकडील कर्ज वसूल झाल्याचा दाखला देत दोन कोटी ३९ लाख ७६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. संशयितांमध्ये संस्थेचे सचिव दत्तात्रय कोरडे (टेकाडीपाडा,वणी), जिल्हा बँकेचे तत्कालीन अधिकारी बाजीराव भदाणे (बेलबारे, कळवण) आणि किशोर गांगुर्डे (वणी) यांचा समावेश होता. अपहाराची रक्कम जास्त असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा हस्तांतारीत करण्यात आला होता.
संशयितांना १७ महिने अटक झाली नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. या संदर्भात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशानुसार तातडीने तीनही संशयितांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावले. चौकशीत गुन्ह्यात संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोरडे, भदाणे आणि गांगुर्डे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.