लोकसत्ता वार्ताहर

नंदुरबार : जिल्ह्यास तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले असून २४ तासांत तीन जण पुरात वाहून गेले. जिल्ह्यात ४२ घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने तीन दिवसांपासून जोर धरला आहे. जिल्ह्यात २४ तासांत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धडगाव तालुक्यातील माळचा गेंदा येथील बायसिंग पावरा (३६), अक्कलकुवा तालुक्यातील गुलीअंबर येथील संतोष वसावे यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील शासकीय आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक असलेले ईश्वर वसावे (रा. गमन) हे नदी ओलांडत असताना वाहून गेले. त्यांचा मृतदेह सोमवारी सकाळी १० वाजता सापडला.

आणखी वाचा-महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही

धडगाव तालुक्यातील उदई नदीला आलेल्या पुरामुळे धडगाव- तळोदा दरम्यानच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात ४२ घरांची अंशत: पडझड झाली आहे. शेतात पाणी साचल्याने कापूस, पपई, केळी, मिरची पिके संकटात सापडली आहेत. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प भरल्याने ओसंडून वाहू लागले आहेत. शहादा तालुक्यातील सुसरी धरणातून गोमाई नदीत विसर्ग सुरु करण्यात आल्याने तिखोरे गावाजवळील पुलाचा एक भाग खचल्याने रविवारी रात्रीपासूनच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक धरण दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणाचे तीनही दरवाजे रविवारी रात्री १० वाजता १५ सेंटिमीटरने वर उचलण्यात येवून शिवण नदीत विसर्ग सुरु करण्यात आला. दोन वर्षांपासून धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने नंदुरबार शहरात पाणी कपात केली जात होती. नंदुरबारकरांना चार दिवसाआड पाणी मिळत होते. मात्र आता धरण भरल्याने कपातीचे संकट दूर होण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवापूर तालुक्यात रंगावली नदीला पूर आला. संततधारेमुळे अमरावती-सुरत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला आहे. तपासणी नाक्याजवळ मालमोटर बिघडल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावर पाच ते सहा किलोमीटर रांगा लागल्या होत्या. महामार्गाचे अनेक वर्षांपासून संथपणे काम सुरु असुन त्याचा फटका वाहतुकीला बसत आहे.