राम कृष्ण हरी…जय हरी विठ्ठल… असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. वारकऱ्यांच्या अखंड नामस्मरणामुळे त्र्यंबक नगरी दुमदुमली आहे. त्र्यंबक नगरीत दाखल होणाऱ्या दिंडीचे नगरपालिका प्रशासनासह नागरीकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर येथील संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने सोमवारपासून २१ जानेवारी पर्यंत पौषवारी यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. १८ जानेवारी रोजी पहाटे चार वाजता शासकीय महापूजा होईल. महापूजेनंतर नगर परिक्रमा होणार आहे. यावेळी श्री त्र्यंबकराजा भेट आणि कुशावर्त स्नान होईल. उत्सव काळात रमेश एनगांवकर, मोहन बेलापूरकर, बाळासाहेब देहुकर, डॉ. रामकृष्ण लहवितकर, कान्होबा देहुकर, उखळीकर महाराज, जयंत गोसावी यांचे कीर्तन होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्सवात सहभागी होण्यासाठी दिंड्या त्र्यंबक नगरीत दाखल होत आहेत. डोक्यावर तुळशीवृंदावन, माऊलीचा गजर, विणेकरी-टाळकरींचा अखंड नाद असे उत्साहपुर्ण वातावरण त्र्यंबक नगरीत आहे. आलेल्या वारकऱ्यांचे प्रशासनाकडून स्वागत होत असून मानाच्या दिंड्या, मानकरी व स्वयंसेवक यांना नारळ व प्रसाद देत स्वागत करण्यात येत आहे. वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पिण्यासाठी पाणी, फिरते स्वच्छतागृह , आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वारी निर्मलवारी व्हावी यासाठी प्रशासनासह देवस्थान प्रयत्न करत आहे. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्र्श्न निर्माण होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस बंदोबस्त आदी व्यवस्था करण्यात आली आहे.