जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आई-वडिलांची नजर चुकवून तापी नदीत पोहण्यास गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. दोघांपैकी एकाचा मृतदेह त्याच दिवशी रात्री तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला.

नीम येथील रहिवासी असलेले मयूर उर्फ हरीश पाटील (१२) आणि चेतन पवार (नऊ) हे दोघे शाळेला उन्हाळी सुटी असल्याने नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गावालगतच्या तापी नदीवर पोहण्यास गेले होते. मात्र, दुपारी चार वाजले तरी दोघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. नदीत पोहण्यासाठी उतरण्यापूर्वी त्यांनी अंगातील कपडे काठावर दगडांखाली ठेवले होते.

सायंकाळी सहाला गावातील गुराखी नदीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्यावर त्यांना तिथे दगडाखालील कपडे दिसून आले. त्यामुळे नीम गावात ते कपडे कोणत्या मुलांचे आहेत म्हणून चर्चा झाली. हरीश आणि चेतन यांचे नातेवाईक त्यांना शोधत होतेच. त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मुलांचे कपडे ओळखले. त्यानंतर दोघेही तापीच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता गृहीत धरून त्यांचे मृतदेह शोधण्यास सुरूवात झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी रात्री चेतनचा मृतदेह तापीच्या पात्रात तरंगताना आढळला. हरीशचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याच परिसरात दिसून आला. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. चेतन हा चौथीत आणि हरीश हा सातवीत शिकत होता. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक जिभाऊ पाटील पुढील तपास करीत आहेत.