जळगाव : पुणे येथे नोकरी, व्यवसाय, शिक्षण तसेच इतरही बऱ्याच खासगी कामांसाठी हजारो प्रवाशी जळगावहून दररोज जात असतात. मात्र, विमानसेवेला मर्यादा असताना एसटी तसेच खासगी आराम बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नऊ-दहा तास सहजपणे लागतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे जळगाव-पुणे प्रवासाचा वेळ बऱ्यापैकी वाचणार आहे. मात्र, प्रवाशांना या गाडीने झोपून नव्हे तर बसूनच प्रवास करावा लागणार आहे.
राज्यातील अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत असताना जळगाव जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मार्गावरून तशी कोणतीच एक्स्प्रेस आजतागायत धावताना दिसून आली नव्हती. मात्र, पुणे-नागपूर (अजनी) मार्गावर आता रविवारपासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. जिल्ह्यात जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबणाऱ्या या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार असून, भुसावळ स्थानकावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि जळगाव स्थानकावर खासदार स्मिता वाघ उपस्थित राहणार आहेत. मुंबई-नागपूर किंवा पुणे-नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून करण्यात येत होती. उशिरा का होईना आता वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला यश येत आहे. या एक्स्प्रेसमुळे पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व आरामदायी होऊ शकणार आहे. ज्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांनाही होणार आहे.
प्रवासाची वेळ किती कमी होईल ?
सद्यःस्थितीत नागपूर ते पुणे दरम्यान अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या धावतात. मात्र, दुरांतो एक्स्प्रेस वगळता इतर सर्व रेल्वे गाड्यांना पुण्याहून नागपूर पोहोचण्यासाठी १५ ते १६ तास सहजपणे लागतात. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर पुणे ते नागपूर दरम्यानचा प्रवास अवघ्या १२ तासात शक्य होईल. ही नवीन गाडी या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे ठरणार आहे. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वात जलद रेल्वे गाडी आहे. पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला १२ तास ५५ मिनिटे वेळ लागतो. नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारतला दुरांतोपेक्षा एक तास कमी वेळ लागणार आहे. पुणे येथून सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी १२.३५ वाजता जळगाव स्थानकावर पोहोचेल. तर नागपूरहून सुटलेली वंदे भारत एक्स्प्रेस जळगाव स्थानकावर दुपारी ०३.२८ वाजता येईल आणि पुणे येथे रात्री ०९.५० वाजता पोहोचेल. दोन्ही बाजुंनी प्रत्येकी सव्वासहा तासांचा वेळ जळगाव ते पुणे प्रवासासाठी लागेल.
वंदे भारतला शयनयान डबे नसणार
पुणे येथून सुटल्यानंतर दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव आणि मनमाड स्थानकावर थांबणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला चेअरकारची सुविधा पुरविण्यात येणार आहे. आठ तासांपेक्षा अधिक वेळेचा प्रवास असल्याने या एक्सप्रेसला शयनयान (स्लीपर) डबे जोडले जातील, असा अंदाज प्रवाशांमधून बांधण्यात आला होता. परंतु, दिवसभराचा प्रवास असल्याने शयनयान ऐवजी चेअरकार असलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.