राष्ट्रवादीतील बंडखोरीकडे नेत्यांची पाठ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील आठवडय़ात राष्ट्रवादीमध्ये राहू इच्छिणाऱ्या अकरा नगरसेवकांना दिलेला दिलासा, माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांनी केलेली चर्चा, या व्यतिरिक्त नवी मुंबईतील बंडखोरी रोखता यावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकांपैकी काही नगरसेवक नाईकांच्या सोबत भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत. माथाडी नेते शिंदे यांनी तर आपण नाईकांबरोबर लढू शकत नाही असे जाहीर करून गडय़ा आपला गाव बरा असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

नवी मुंबई राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे येथील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांची भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यांच्या आमदार चिरंजीव संदीप नाईक यांनी तर भाजपच्या कार्यक्रमांची आखणी सुरू केली आहे. नाईकांच्या विरोधात राष्ट्रवादीतील बडी मंडळी तोफ डागतील अशी अपेक्षा होती मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या बंडखोरीकडे साधे ढुंकनही पाहिलेले नसल्याचे चित्र आहे. पक्षाची मुलुख मैदान तोफ ओळखली जाणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही बंडखोरी फारशी गंभीर घेतलेली नाही. पक्षाचे मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाईकांवर चांगलेच तोंडसुख घेऊन प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे नाईक सर्मथक कार्यकर्ते संतापले आहेत.

माथाडी नेते शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या मतदारसंघात (कोरेगाव) लक्ष घालण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे नाईकांचा सामना करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक व्यापारी नगरसेवक अशोक गावडे व उरणकर प्रशांत पाटील यांच्यावर आली आहे. त्यामुळे दोन आठवडय़ातच पक्षातील उरली सुरली हवा निघून गेली आहे. शिल्लक राहिलेल्या अकरा नगरसेवकांपैकी पवार यांना भेटण्यास गेलेले तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी नाईक यांच्या सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी त्यांच्यावर विविध पातळीवर दबाव आणला जात असल्याचे समजते. सीबीडी बेलापूरमधील तीन नगरसेवक पवार यांना मुंबईत भेटण्यासाठी जाणार होते पण त्याच दिवशी त्यांना अतिशय ‘प्रेमाने’ एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते.

महापौरपदासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

नाईकांच्या भाजप प्रवेशानंतर विधानसभा निवडणुका आटपल्यावर पालिका सत्तांतराचा अंक सुरू होणार आहे. यात राष्ट्रवादीचे एकूण ५२ नगरसेवक आहेत. त्यातील दोन तृतीयांश म्हणजे ३५ नगरसेवक दुसऱ्या अर्धात भाजपामध्ये प्रवेश करू शकणार आहेत. यात आणखी दोन-तीन नगरसेवकांची भर पडणार आहे. पक्षांतर केलेले ३९ नगरसेवक आणि भाजपचे जुने सहा नगरसेवक असे ४५ नगरसेवकांचे संख्याबळ होणार आहे. शिवसेना नाईकांच्या भाजप प्रवेशाला या ठिकाणी पांठिबा देणार नाही. त्याऐवजी शिवसेनेच्या ३८ नगरसेवकांना काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सर्मथन देण्यास तयार आहेत. शिवसेनेचा महापौर झाला तरी चालेल पण नाईकांच्या भाजपचा महापौर होणार नाही याची काळजी शिवसेना घेणार आहे. त्या दृष्टीने शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे.