९१ प्रवाशांसह सात चालक ताब्यात, द्रुतगती महामार्गावर कारवाई पनवेल/नवी मुंबई : संचारबंदीच्या काळात मुंबईत भाजीपाला, दुध यांचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या वाहनांवर अत्यावश्यक सेवेच्या फलकाखाली अवैध वाहतूक सुरू असल्याची समेर आले आहे. दहा वाहनांची तपासणी केल्यानंतर यातून समारे 91 प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. प्रवासासाठी एक ते दोन हजार रुपये या प्रवाशांकडून उकळण्यात आल्याचेही या कारवाईत समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील मुंबई-पूणे द्रुतगती महामार्गावर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी विशेष आदेश दिल्यानंतर कळंबोली पोलिसांनी ही कारवाई केली. गावाला जाण्याऐवजी पोलीस ठाण्यात यावे लागले अशी भावना या प्रवाशांची आहे. या प्रवाशांमध्ये लहान मुले व महिलांचाही समावेश आहे. संचारबंदीत स्वत:सह कुटुंबीयांना घरात कोंडून राहण्यापेक्षा मिळेल ते वाहन पकडून गावी जाण्याचा बेत अनेकांनी आखला आहे. त्यामुळे मुंबई-पूणे द्रुतगती महामार्गावर तुरळक का होईना मात्र वाहनांची संख्या दिसते. मागील तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी कोणतीही मालवाहतूक करणारे वाहनाला थांबवू नये असे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी दिले होते. मात्र अनेकजण गावी जाण्यासाठी याच मालवाहतूक व खासगी वाहनांचा वापर करत असल्याचे समजताच आयुक्त संजयकुमार यांनी द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी कळंबोली पोलीस कारवाई करताना स्वत:च हजेरी लावली. दोन पीकअप जीपमधून लपून जाणारे ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले. या दरम्यान वाहन तपासणी सुरू असताना पोलिसांना दुधाच्या पीकअप जीपचे शटर लावून तसेच केळीच्या पानांमध्ये स्वत:ला लपवून अशा विविध शक्कल लढवून प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकीसह पाच खासगी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी प्रवाशांना व सात चालकांना ताब्यात घेऊन कार्यवाहीला सुरूवात केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ७० जणांच्या दुपारच्या जेवणाची सोय ठाण्यात करण्यात आली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरातील मंदीरामध्ये हे प्रवासी विसावले होते. पोलीस आयुक्तांनी यानंतर नवी मुंबईत प्रवेश करणारे सर्व प्रवेशद्वारावर बंदोबस्त वाढविण्याच आदेश दिले. ताब्यात घेतलेल्या प्रवाशांना पुढे गावी न जाऊ देता, दुपारचे जेवण पोलिसांनी दिले. त्यानंतर या प्रवाशांना महसूल विभागाच्या ताब्यात देण्याचे आयुक्त संजयकुमार यांनी सूचविले. हे सर्व प्रवासी कर्नाटक, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातील होते. त्यांना गावाकडे जाणे अधिक धोकादायक असून शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून २१ दिवस घरातच थांबण्याची समज देण्यात आली आहे. वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. -सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली