नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यावर्षी ५२४ धोकादायक इमारतीं असल्याची माहिती पालिकेने प्रसिध्द केली असून त्यामध्ये ६१ इमारती राहण्यास योग्य नसल्याचे जाहीर केले आहे.गेल्यावर्षी शहरात एकूण ५१४ धोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली होती.यावर्षी ही संख्या वाढली असल्याचे दिसत असले तरी गेल्यावर्षी अतिधोकादायक असलेल्या काही इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरु झाल्याचे चित्र आहे. महापालिकेच्यावतीने दरवर्षी विभागवार सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५२४ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६४ नुसार धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ६१ इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ११४ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ३०० इमारती असून इमारतीची किरकोळ दुरूस्ती करण्यासारख्या असलेल्या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणा-या ४९ इमारती, अशाप्रकारे एकूण ५२४ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे. त्याचप्रकारे ही यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर 'विभाग' सेक्शनमध्ये 'अतिक्रमण विभाग' माहितीच्या सेक्शनमध्ये सहज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी-१’ प्रवर्गामध्ये नमूद ६१ इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. हेही वाचा >>> नवी मुंबई : गॅस सिलिंडर भरलेली वाहने रस्त्यावरच पार्क; अपघाताला निमंत्रण राहण्यास अयोग्य असलेल्या अतिधोकादायक सी -१ प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जलजोडणी खंडीत करण्यात येईल असेही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.अशा अति धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्त हानी होण्याचा संभव लक्षात घेऊन सदर इमारतीचा बांधकामाचा निवासी , वाणिज्य वापर त्वरित बंद करावा आणि सदरची इमारत , बांधकाम विनाविलंब तोडून टाकावे असे सूचित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, सदर इमारत, बांधकाम कोसळल्यास होणा-या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही असे स्पष्टपणे सूचित करण्यात आलेले आहे.या नोटिसीमध्ये धोकादायक इमारतींच्या नावासमोर रहिवास वापर सुरु आहे अथवा नाही याचीही नोंद करण्यात आलेली आहे. इमारतीच्या वर्गीकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर , रहिवास करणा-या नागरिकांनी इमारत तात्काळ निष्कासीत करावयाची आहे किंवा वर्गीकरणानुसार नमूद केल्याप्रमाणे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणा-या भोगवटाधारकांनी इमारत दुरुस्त करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कोणत्याही प्रकारे धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेचा दिव्याखाली अंधार… पालिका मुख्यालय परिसरात कचऱ्याचा ढीग नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात धोकादायक इमारतींची यादी महापालिकेने घोषित करण्यात आली असून गेल्यावर्षी अतिधोकादायक असलेल्या इमारतींची संख्या ही ६१ होती.त्यातील १५ इमारती निष्कसित करण्यात आल्या आहेत. तर यावर्षी अतिधोकादायक इमारतींची संख्या १५ ने वाढल्याने शहरातील अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य इमारतींची संख्या ६१ झाली आहे. त्यामुळे या अतिधोकादायक इमारतीमधील रहिवास तात्काळ थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमनाथ पोटरे, उपायुक्त अतिक्रमण विभाग