उरणमधील जेएनपीटी परिसरातील पाणजे व डोंगरी गावांच्या शेजारी तसेच दास्तान फाटा येथे दरवर्षी फ्लेमिंगोसह इतर जातीचे पक्षी हजारोंच्या संख्येने येत असून या परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावामुळे त्यांच्या भक्ष्यांची संख्या कमी झाल्याने या पक्ष्यांचे नवीन ठिकाण शोधात स्थलांतर सुरू आहे. सुरुवातीला न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या मिठागर परिसरात त्यांचे वास्तव्य असायचे तेथे मातीचा भराव झाल्याने ते पाणजे खाडीच्या आसऱ्याला गेले. सध्या या परिसरातही भरावाचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांनी दास्तान फाटय़ाच्या खाडीची वाट धरली होती. मात्र येथील भक्ष्याची संख्या कमी झाल्याने पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे.

निसर्गावरील मानवाच्या आक्रमणाचे अनेक परिणाम सध्या पृथ्वीवर जाणवू लागले आहेत. निसर्गातील पक्षी हाही एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या जीवनचक्रानुसार तो आपले अल्पशा जीवनात का होईना या निसर्गात जीवन जगत असतो. त्यासाठी तो जगातील अनेक देश पादाक्रांत करीत हिवाळ्यात भारताची विशेषत: मुंबई, नवी मुंबई आणि उरणच्या खाडी किनाऱ्याची वाट धरतो. याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्र व या परिसरातील कांदळवन (खारफुटी)मुळे मासळीच्या प्रजननाची होणारी प्रक्रिया व त्यातून निर्माण होणारे कीटक, छोटे मासे हे मुख्य खाद्य असलेले पक्षी या परिसरात हजारोंच्या संख्येने येत आहेत. त्यांची उरणमधील मुख्य ठिकाणे म्हणजे डोंगरी व पाणजे गावाजवळील किनारा तसेच जेएनपीटीच्या लँडिंग जेट्टीजवळील परिसर ही होती. या परिसरात सध्या रात्रंदिवस वाहने चालत असल्याने पक्ष्यांचे मुख्य ठिकाण नष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या या पक्ष्यांनी उरण पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील दास्तान फाटा परिसरातील खाडीमध्ये आपले नवे ठिकाण शोधले होते. मात्र या परिसरातील पक्ष्यांचे अन्न कमी होऊ लागल्याने त्यांची स्थलांतरे सुरू झाली आहेत. निसर्गातील या पक्ष्यांच्या सुरक्षेची व त्यांच्या सुरक्षित व कायमस्वरूपी पानथळ्यांची मागणी येथील निसर्ग व पक्षीप्रेमींकडून केली जात आहे. या पक्ष्यांच्या पानथळ्याची सुरक्षा करण्याची मागणी पक्षीप्रेमी निरंजन राऊत यांनी केली आहे.