जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या एलिफंटा बेटावरील तीन गावातील ग्रामस्थ व दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांची पिण्याच्या पाण्याची नव्या योजनेमुळे व्यवस्था होणार आहे. यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १७ कोटी ५९ लाख खर्चाच्या घारापुरी नळ पाणीपुरवठा योजनेला कोअर कमिटीनंतर कॅबिनेट बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या महत्वकांक्षी योजनेमुळे बेटावरील तीन गावांचा आणि पर्यटकांचा पुढील ४० वर्षांकरीता (सन- २०५४ ) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
७५ वर्षांनंतर कायमस्वरुपी वीजेचा प्रश्न सहा वर्षांपूर्वी मार्गी लागला आहे. बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर ही तीन गावे आणि येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वर्षांपासून गावोगावी असलेल्या विहिरी,धरणाचा उपयोग केला जात आहे. मात्र, उन्हाळ्यात विहिरी, धरणातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत असल्याने कित्येक वर्षे पाण्याची समस्यांना सामोरे जावे लागते.
बेटावरील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी तीनही गावे आणि पर्यटकांसाठी घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राजिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला होता. २०२१ साली सादर केलेल्या प्रस्ताव खर्चाच्या दृष्टिकोनातून राजिपच्या आवाक्याबाहेर होता.पाच कोटींपेक्षा अधिक असलेल्या खर्चामुळे २९ जुन २०२२ रोजी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी मंजुरीनंतर घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडे पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळानेही १७ कोटी ५९ लाख खर्चाचा अंतिम मंजुरीसाठी मंत्रालयाकडे धाडला होता, अशी माहिती महाराष्ट्र प्राधिकरण महामंडळाचे उप अभियंता नामदेवराव जगताप यांनी दिली.
हेही वाचा- यंदा मोरबे धरण १०० टक्के भरण्यास हुलकावणी…!
शिवसेनेच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे, सरपंच बळीराम ठाकुर यांच्याकडून २०२१ पासूनच सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर घारापुरी नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव ११ आक्टोंबर २०२२ रोजी कोअर कमिटीच्या बैठकीत तर १२ आक्टोंबर रोजी कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
काय आहे योजना
बेटावरील मोरा बंदर येथील मोठा तलावातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. यासाठी तलावाची खोली वाढविण्यात येणार आहे. त्याभोवती संरक्षण भिंतीसह फिल्टरेशन प्लाण्ट बसविण्यात येणार आहे.
हेही वाचा- सोमवारपासून बेलापूर ते जेएनपीटी वॉटर टॅक्सी सेवा सुरु
योजनेचा खर्च: १७ कोटी ५९ लाख, पुढील ४० वर्षांपर्यंत (सन २०५४ ) २० लाख ७ हजार लिटर्स. ॲप्रोच ब्रीज, वाटर ट्रिटमेंट प्लाण्ट,जॅक वेल, प्रती मिनिट १३९१७ लिटर्स उपसा करण्यासाठी ७.५ हार्स पावरचे पंप, पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.