नवी मुंबई: मुंबईतून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरांच्या दिशेने ये-जा करण्यासाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत आखण्यात आलेल्या बहुचर्चित ऐरोली-काटई मार्गावरून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या जोड मार्गिकेचा विषय अखेर निकाली निघाला आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावरून मुलुंडच्या दिशेने चढण्याकरिता तसेच मुलुंडकडून नवी मुंबईच्या दिशेने उतरण्याकरिता मार्गिका बांधण्यासाठी ४९ कोटी रुपयांच्या कंत्राटास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नुकतीच मान्यता दिल्याने नवी मुंबईकरांनाही या मार्गाचा फायदा मिळणार आहे.

गेल्या काही वर्षात शीळ-कल्याण मार्गाला समांतर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या राहात आहेत. ठाणे महापालिका हद्दीत असलेला दिवा, देसाई, डायघरपर्यंतचा पट्टा तसेच त्यापुढे पलावा, २७ गाव तसेच प्रस्तावित ग्रोथ सेंटरच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर विशेष नागरी वसाहतींच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जात असून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ते अगदी वांगणीपर्यंत चौथ्या मुंबईचा विस्तार होताना दिसत आहे. विस्तारत जाणाऱ्या या नागरी पट्ट्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे विणण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऐरोली-काटई रस्त्याची आखणी करण्यात आली असून यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरातून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दळणवळणाचा एक नवा मार्ग प्रवाशांना उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच शिळ-कल्याण रस्त्यावरील भारही यामुळे कमी होणार आहे.

हेही वाचा… अखेर दुय्यम निबंधक कार्यालयाला अखेर नवीन जागा मिळाली….

ऐरोली खाडीपुलास समांतर मार्गावरून ऐरोली येथील अग्निशमन केंद्रालगत असलेल्या रस्त्यावरून ठाणे-बेलापूर मार्गास उन्नत स्वरूपात हा मार्ग पुढे पारसिकच्या डोंगराच्या दिशेने पुढे सरकतो. रेल्वे मार्गिकेवरून ठाणे- बेलापूर मार्गावर ज्या ठिकाणी हा मार्ग पोहचतो तेथेच मुलुंडच्या वर चढणारी एक मार्गिका पहिल्या टप्प्यात उभी केली जाणार आहे. मेसर्स एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस ४९ कोटी ९० लाख रुपयांचे हे काम देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा… ओला, उबेर कंपनीच्या मोटारीतील प्रवास खरंच सुरक्षित आहे का? बातमी नक्की वाचा

ऐरोली-काटई मार्गिकेवरून ठाणे-बेलापूर रस्त्याच्या दिशेने खाली उतरणाऱ्या मार्गिकेचे काम दुसऱ्या टप्प्यात दिले जाईल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. ऐरोली-काटई रस्त्याची आखणी तीन टप्प्यांत आहे. यापैकी पहिल्या भागात ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग चार या साडेतीन किलोमीटर अंतराच्या मार्गाची बांधणी केली जाणार आहे. दुसºया टप्प्यात ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर रोड या अडीच कि.मी. अंतराच्या रस्त्याची बांधणी केली जात आहे. यापैकी पहिल्या दोन टप्प्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून ठाणे-बेलापूर मार्गापासून राष्ट्रीय महामार्ग चारपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या भोगद्यााचे कामही अंतिम टप्प्यात आहे. तिसºया टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग चार ते काटई नाका जंक्शनपर्यंत साडेसहा किलोमीटर उन्नत मार्गाची बांधणी केली जाणार आहे. या टप्प्याचे काम पुरेशा वेगाने सुरू नसल्याची ओरड सातत्याने केली जात आहे.

नवी मुंबईकरांना दिलासा

सुमारे १५०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाºया या मार्गाचा नवी मुंबईकरांना कोणताही उपयोग होत नसल्याची ओरड मध्यंतरी सुरू झाली होती. ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी मध्यंतरी या मुद्द्यावर आंदोलनाची भूमिका जाहीर केली होती. या मार्गावरून नवी मुंबईकरांना उपयोगी ठरेल असा एक जोडरस्ता ठाणे-बेलापूर मार्गाला दिला जावा, अशी मागणीही नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नाईकांच्या या मागणीची दखल घेत ठाणे-बेलापूर रस्त्यावरून मुलुंडच्या दिशेने चढण्याकरिता आणि मुलुंडकडून ठाणेच्या दिशेने उतरण्याकरिता नव्या मार्गिकेची निर्मिती करण्याचे ठरविले असून काल-परवापर्यंत कागदावर असलेल्या या प्रकल्पासाठी ठेकेदार नियुक्तीचे कामही नुकतेच पूर्ण झाले आहे, अशी माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐरोली-काटई मार्ग नवी मुंबईतून उड्डाण घेत असताना नवी मुंबईकरांना त्याचा उपयोग व्हायला हवा ही माझी मागणी होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने यासंबंधीचा निर्णय घेत ठाणे-बेलापूर मार्गिकेवरून चढ-उताराच्या मार्गिकांची कामे अंतिम केली हा नवी मुंबईकरांच्या आग्रही मागणीचा विजय म्हणायला हवा. चढ (अप) मार्गिकेसोबत उतार (डाऊन) मार्गिकेची कामेही लवकरच सुरू होतील ही अपेक्षा आहे. – गणेश नाईक, आमदार, ऐरोली