उरण : स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या करंजा-कोंढरी येथील अनेक वस्त्यांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून २५ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर आणखी किती वर्षे पाणीटंचाई सहन करायची असा सवाल केला जात आहे. याचा जाब विचारण्यासाठी १ जानेवारीला ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

करंजा-कोंढरी आणि परिसर हा तालुक्यातील सर्वात मोठ्या चाणजे ग्रामपंचायतीचा भाग आहे. जवळपास ३० हजार लोकवस्ती आहे. तर कोंढरी परिसरात दहा हजारपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. या विभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र तरीही येथील पाण्याचा प्रश्न न सुटल्याने करंजा येथील ग्रामस्थांनी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आक्रोश केला होता. त्यानंतर काही महिने आठवड्यातून सात दिवसांनी पाणी येऊ लागले होते. मात्र पुन्हा एकदा यामध्ये वाढ झाली आहे.मागील पंचवीस दिवसांपासून पाण्याची वाट पाहत असल्याची माहिती कोंढरी येथील विनायक पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात वर्षभरात सव्वा दोन लाख वाहनांची नोंदणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करंजा आणि कोंढरीसह इतर पाड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन तहसील कार्यालयावरील मोर्चाच्या वेळी देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ आणि नागरिक आंदोलन करणार आहोत.सीताराम नाखवा, माजी सदस्य,  रायगड जिल्हा परिषद