वाडा: वाडा नगरपंचायत प्रशासनाचा सध्या ढिसाळ कारभार दिसून येत आहे. जवळपास दीड महिन्यापासून बंदिस्त गटारीसाठी काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यालगत तीन वेळा खोदाई करण्यात आली आहे, मात्र नगरपंचायत प्रशासन आणि ठेकेदाराला गटारीचे काम पूर्ण करण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक, वाहनचालकांना आजही जीवघेण्या रस्त्यावरून मोठी कसरत करून जावे लागत आहे. याकडे वाडा नगरपंचायत प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने वाडा शहरातील समस्या सुटताना दिसून येत नाही. आधीच वाडा नगरपंचायत विविध समस्यांच्या गर्तेत आहे. त्यात प्रामुख्याने गटारींची समस्या सोडविण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी तथा प्रशासक मनोज पष्टे यांच्या कारभारावरच आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
वाडा शहरातील स्टेट बँक ते पंचायत समिती या मार्गाचे (रस्त्याचे) मागील ६ महिन्यापूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण जरी झाले असले तरी त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन एका बाजूने गटारीचे काम झाले आहे, हे काम कॉंक्रिटीकरणाच्या कामातच समाविष्ट होते.मात्र दुसऱ्या बाजूने बंदिस्त गटार करण्याचे काम करण्यात आलेले नाही. यासाठी निधी मंजूर नसल्याने काम रखडले असल्याचे वाडा प्रशासनाकडून यापूर्वी सांगितले जात होते.मात्र आता या दुसऱ्या बाजूच्या बंदिस्त गटारीसाठी निधी मंजूर झाला असल्याचे वाडा नगरपंचायतचे अभियंता भुषण घनवट यांनी “लोकसत्ता”शी बोलताना सांगितले.
दरम्यान, मधल्या काळात या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर जवळपास ५ महिने होवून देखील दुसऱ्या बाजूला गटार होत नसल्याने खोदाई केलेल्या भागात माती टाकण्यात आली होती. ही माती मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी टाकली असल्याचा दावा केला आहे.मात्र, या मातीमुळे पावसाळ्यात पाण्याचा अडथळा व चिखल होवून त्याचा रहिवाश्यांना त्रास होईल म्हणून काही दिवसांतच गटार बनविण्यासाठी माती बाहेर काढण्यासाठी खोदाई करण्यात आली.
मात्र आता पर्यंत सलग तीन वेळा गटारीसाठी खोदकाम करून देखील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गटारीचे काम सुरू करण्यात आले नाही. या गटारीसाठी खोदलेल्या या खड्ड्यात आता पर्यंत अनेक नागरिकांची वाहने अडकली होती. या अपूर्ण कामामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना, वाहन चालकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय लहान मुले, विद्यार्थ्यांना व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
स्टेट बँक ते पंचायत समिती या मार्गाच्या १५० मीटर अंतरावर तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती ही शासकीय कार्यालये व शासकीय अन्नधान्य गोदाम आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग यांची व वाहनांची रेलचेल आहे. येथे रस्त्यालगत खोदकाम केल्याने नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.असे असताना देखील कंत्राटदाराने रस्त्याच्या पूर्ण एका बाजूला मोठ्या खड्ड्यांची खोदाई करून ठेवली असुन दीड महिन्यापासून काम होत नसल्याने खोदकाम “जैसे थे” राहिले असल्याने नागरिकांनी वाडा नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.आठवडा होवून देखील कामाला सुरुवात नाही.
मुख्याधिकारी मनोज पष्टे कंत्राटदारापुढे हतबल..?
२३ मे २०२५ रोजी मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी कंत्राटदाराला काम सुरू करण्याबाबत अनेकदा नोटीस दिल्या आहेत तसेच तातडीने काम सुरू न केल्यास टेंडर रद्द करून काळ्या यादीत टाकण्याचा सज्जड दम असल्याचे “लोकसत्ता”शी बोलताना सांगितले.
तरी कंत्राटदाराने आजमितीस आठवडा होवून देखील कामाला प्रत्यक्षात सुरुवात न केल्याने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या आदेशाला कंत्राटदार जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. यावरूनच प्रशासनाचा कंत्राटदारांवर वचक राहिला नसल्याने कंत्राटदार फोफावले आहेत. मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी कंत्राटदारांना कामातील कसुराई बाबत कारवाईचा दम दिला असल्याचे जरी सांगत असले तरीही ते कंत्राटदारांपुढे अनेकदा हतबल होताना दिसुन येत आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी हे कंत्राटदारावर खरोखच कारवाई करणार की कारवाईचा फुसका बार सोडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.दरम्यान मुख्याधिकाऱ्यांची प्रशासनावरची पकड सैल झाली असुन कार्यपद्धतीत अकार्यक्षमता दिसून येत.
रस्त्यालगत खोदकाम केल्याने मोठा खड्डा पडला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठून राहणार आहे. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना लहान मुलांचा तोल जाऊन खड्ड्यात पडल्यास आणि काही दुर्दैवी घटना घडल्यास याची नगरपंचायत प्रशासन जबाबदारी घेईल का..?- अतिश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, वाडा
कंत्राटदाराला काम सुरू करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. काम सुरू न केल्यास टेंडर रद्द केले जाईल व काळ्या यादीत टाकले जाईल.- मनोज पष्टे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, वाडा नगरपंचायत