उरण: सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसाने उरण शहर आणि तालुक्याची दैना झाली. समुद्राच्या भरतीचे आणि पावसाचे पाणी एकत्र आल्यानंतर कोणती उपाययोजना करायची याचे नियोजन आजपर्यंत करण्यात आलेले नाही. परिणामी काही तास झालेल्या पावसाने दाणादाण उडविली.
येथील अनेक ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षपणामुळे अद्यापही अनेक ठिकाणी मान्सूनपूर्वी नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही.
उरण परिसरातील सुमारे १६ गावे पावसाळ्यात पाण्याखाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. जेएनपीएच्या हद्दीत जसखार, सोनारी, साठरखार, करळ, नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा ही गावे येतात. या गावांबाहेर असलेले लहान,मोठे नाले व गटारांची सफाई जेएनपीएमार्फत केली जाते. मात्र, कोट्यवधींचा निधी खर्च केल्यानंतरही मान्सूनपूर्व कामात अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्याने मात्र दरवर्षी भरतीवेळी मुसळधार पाऊस झाल्यास गावांत पाणी शिरते.
उरण शहरातही नाले सफाईची कामे अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाहीत. त्यामुळे शहरातील सखल भागात दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा उनपचे रचनाकार निखिल ढोरे यांनी माहिती देताना केला आहे.
एकाही गावात पाणी साचणार नाही, समुद्र, खाड्या किनाऱ्यावरील एकाही गावात पाऊस, समुद्राचे पाणी शिरणार नाही याची दक्षता घेण्याचे सक्तीचे आदेश सिडको, जेएनपीए, ग्रामपंचायतींना आढावा बैठकीतच देण्यात आले आहेत. – डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण