लोकसत्ता टीम

पनवेल: कळंबोली वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळी आणि रात्रभर वीजेविना रहिवाशांना रहावे लागले. सकाळी ६ वाजून ५० मिनीटांनी विज पुरवठा पुर्ववत झाला. तब्बल १८ तास कळंबोलीतील २५ हजारांपेक्षा अधिक वीजग्राहक विजेविना होते.

पावसाळ्यात विज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी वीज महावितरण कंपनी दर मंगळवारी दुरुस्तीची कामे हाती घेते. मात्र पावसाळ्यात विजेचा अखंडीत पुरवठा होत नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामे नावापुरती होतात का असा प्रश्न कळंबोलीतील संतापलेले वीजग्राहक विचारत आहेत. मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत विजेच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र सायंकाळी काही तासांसाठी आलेली विज पुन्हा रात्री साडेआठच्या सुमारास गायब झाली.

आणखी वाचा- नवी मुंबई: हलक्या वाहनांनी पर्यायी मार्ग पाम बीचचा वापर करावा, शीव-पनवेल मार्गावर खड्डेच खड्डे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार सकाळपासून दुपारपर्यंत वीजवाहिनीवरील दुरुस्ती झाल्यानंतर दुपारी तीन वाजता तळोजा उपकेंद्रातून येणारी २२ केव्हीची वीजवाहिनीत बिघाड झाला. त्यानंतर रात्री फूडलॅण्ड कंपनीजवळ आरएमव्हीत बिघाड झाला. हा बिघाड काही तासांमध्ये दुरुस्त केला जाईल असे वीज ग्राहकांना सांगण्यात आले. मात्र या दुरुस्तीच्या कामाला पहाटेचे पावणेसात वाजले. या दरम्यान वीज विभागाचे कर्मचारी रात्रभर पावसात जागून काम करत असल्याची माहिती वीज विभागाच्या अधिका-यांनी दिली.