नवी मुंबई : समाज माध्यमातून कमी वेळात जास्त परतावा अशी जाहिरात करून त्याला बळी पडलेल्या गुंतवणूकदाराची २१ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

उदय रत्नपारखी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते एका खाजगी कंपनीत काम करत असून गुंतवणुकीवर भरघोस परतावा ते हि कमी वेळेत अशी जाहिरात त्यांच्या वाचनात आली. उदय यांनी त्या लिंकवर क्लिक करताच त्यांचा समावेश एका व्हाटस अप समूहात करण्यात आला. त्यांना संबंधित व्यक्तीने फोन करून कागदपत्रे मागवली त्यानुसार कागदपत्रे ऑन लाईन देताच एका ऍप द्वारे ऑन लाईन खाते उघडण्यात आले. आणि खाते क्रमांक म्हणून एक  मोबाईल क्रमांक देण्यात आला. उदय यांनी काही पैसे भरले व त्यांना परतावा हि चांगला मिळाला. म्हणून त्यांनी थोडे थोडे करीत १ मार्च ते १ एप्रिल दरम्यान तब्बल २१ लाख ६५ हजार १२७रुपये ऑन लाईन गुंतवले. हे पैसे त्यांनी विविध बँकेत देण्यास सांगण्यात आले होते. त्यांना विविध सहा कामपणीचे भाग (शेगर्स) विकत घेण्यात आले असे सांगण्यात आले.

आणखी वाचा-लोकसभेच्या निवडणुकीत पनवेलच्या मालमत्ता कराचा मुद्दा चर्चेत 

किती रक्कम भरली आणि गुंतवणूकी वर किती परतावा मिळाला हे कळण्यासाठी जो ऍप डाऊन लोड केला होता त्यानुसार उदय यांच्या नावावर ४४ लाख ८१ हजार ६३५ रक्कम जमा असल्याचे दिसत होते. मात्र हि रक्कम उदय यांच्या बँक खात्यात वळती होत नव्हती. ही रक्कम त्यांनी वेळोवेळी मागितली मात्र परतावा जेवढा जमा झाला त्याच्या केवळ २० टक्के रक्कम मिळेल असे सांगून त्यांच्या बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १२७ रुपये पाठवले. मात्र आता रक्कम हवी असेल तर ६ लाख ७२ हजार २२४ रुपये कर अगोदर भरावा लागेल असे त्या अनोखळी व्यक्तीने सांगितले. मात्र आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्याने उदय यांनी याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.