उरण : दिघोडे ते वेशवी मार्गावर जड कंटेनर वाहतुकीमुळे तीन ते चार फूट खोलीचे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे या मार्गावरील प्रवासी दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.

जेएनपीटी बंदरावर अनेक गोदाम चिर्ले, दिघोडे, वेशवी, जांभूळपाडा, दादरपाडा या गावांच्या भागात आहेत. त्यामुळे हा परिसर कंटेनरच्या गोदामाचे गाव म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावरून दिवसरात्र हजारो जड कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत. हा मार्ग रानसई धरणासाठी एमआयडीसीकडून तयार करण्यात आला होता. त्यानंतर सध्या हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. हा दास्तान ते दिघोडे मार्ग होता. यातील दास्तान ते चिर्ले मार्गावर नव्याने उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र चिर्ले ते दिघोडे मार्गा वरील वाढत्या वाहनांमुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. हे बुजविण्याची व रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.

मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव बासनात

या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव असून तो अनेक वर्षे बासनात गुंडाळला गेला आहे. या कामाची तीनशे कोटीपेक्षा अधिकची निविदा प्रसिद्ध झाली आहे. मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार असा सवाल येथील प्रवाशांनी केला आहे. खड्ड्यामुळे मात्र याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

चिर्ले ते दिघोडे मार्गावरून प्रवास करीत असताना धूळ, माती आणि खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे उरणच्या खोपटे कोप्रोली आणि इतर काही रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय ठाकूर, प्रवासी.