नवी मुंबई : वाशी गाव खाडी किनारा आता पुन्हा हिरवाईने नटणार आहे. कांदळवन विभागाने या ठिकाणी सुमारे दहा एकर जागेत नव्याने कांदळवन क्षेत्र निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत.

या भागात २५ मार्च पासून कांदळ राडारोडा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा राडारोडा रस्त्यांच्या कामासाठी वापरावा अशी विनंती नवी मुंबई महानगरपालिकेला करण्यात आली आहे. वाशी गावानजीक असलेल्या खाडी किनाऱ्यावरील मोठा भाग राडारोडा टाकणाऱ्यांनी व्यापला होता. गेले अनेक दशके राडारोडा टाकल्याने येथील कांदळवन मोठ्या प्रमाणात नष्ट झाले होते. ‘डेब्रिज माफिया एरिया’ अशी या भागाची ओळख झाली होती.

या भागात म्हणजे सर्व्हे क्रमांक १७ येथे प्रचंड राडारोडा पडला होता. त्यात वरचेवर भर पडत होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदळवन नष्ट झाले होते. त्यात या ठिकाणी अनधिकृत पाने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. याच ठिकाणी पुन्हा नव्याने कांदळवन उभे करण्यासाठी कांदळवन विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ४. २० हेक्टर म्हणजेच सुमारे दहा एकर परिसरापैकी २. ९ हेक्टरवर कांदळवन उभे राहणार आहे.

सध्या हा राडारोडा काढण्याचे काम वेगात सुरू आहे. या ठिकाणी कांदळ रोपे ( Rhizophora mucronate) लावण्यात येणार आहेत तर समुद्री वनस्पती असलेले तिवर ( Avicennia offcinalis) नैसर्गिक रित्या उभे राहतील. या ठिकाणी पडलेला राडारोडा हटवून एका ठिकाणी जमा करण्यात येत आहे. तो राडारोडा घणसोली ऐरोली येथील रस्त्यांच्या कामासाठी वापरावा अशी विनंती नवी मुंबई मनपाला कांदळवन विभागाने केली असून त्याला नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यापूर्वीचा प्रयोग यशस्वी

या पूर्वी जून २०२३ ला असाच प्रयोग करण्यात आला होता. तो यशस्वी झाला आहे. वाशी स्टेशन नजीक सर्वे क्रमांक ८४० येथे सुमारे ५० गुंठे जागेवर राडारोडा टाकण्यात आला होता. वर्षानुवर्षे हेच सुरु असल्याने झाडे मृत झाली होती तर पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. त्या ठिकाणीही पाण्याचा प्रवाह सुरू करण्यात आला आणि कांदळ लागवड करण्यात आली होती. आज तेथे पूर्ण वन उभे राहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोट -वाशी गाव नजीक कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आला होता तसेच मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला होता. त्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी कांदळवन नष्ट झाले तेथील राडारोडा काढण्यात आला आहे. तिथे वनक्षेत्र पुन्हा निर्मिती सुरू करण्यात आली आहे. लवकरच वन उभे राहील. येथील राडारोडा एका ठिकाणी जमा करण्यात आला असून तो रस्ते कामासाठी वापरण्यात यावा अशी विनंती मनपाला करण्यात आली आहे. – सुधीर मांजरे, कांदळवन अधिकारी