उरण : येथील नागाव ते केगाव या किनाऱ्याची होणारी धूप व सुरू असलेली दुरावस्था थांबविण्यासाठी १० कोटी पेक्षा अधिक रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे मोठं मोठे दगड पुन्हा एकदा निखळू लागले आहेत. त्यामुळे बंदिस्ती मधील मोठं मोठे दगड समुद्रात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात पावसाळ्यात येणाऱ्या ५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या समुद्राच्या महाकाय लाटांमुळे पिरवाडी किनारा पुन्हा उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पर्यटकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असलेल्या उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सुट्टीच्या दिवशी तर प्रचंड गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे या किनाऱ्यावर ओएनजीसी सारखा महत्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प व नागाव मधील लोकवस्ती आहे. मागील अनेक वर्षात पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे पिरवाडी किनाऱ्यावरील धूप वाढली होती. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी,फोफळी ची वृक्ष उखडून निघत होती. त्याचप्रमाणे समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील नागाव परिसरात शिरत होते. परिणामी येथील विहीरीतील पिण्याचे पाणी व शेतीत ही समुद्राचे खारे पाणी येऊ लागल्याने समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी पिरवाडी किनाऱ्यावरील बंदिस्ती मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकामच्या किनारा विभागाने या किनाऱ्यावरील मजबूतीसाठी मोठमोठे दगड किनाऱ्यावर टाकून बंदिस्ती केली आहे. मात्र यातील अनेक दगड हळूहळू निखळू लागले आहेत.
पावसाळ्यात येणाऱ्या मोठया लाटांमुळे यात वाढ झाली आहे. त्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना ही अपघात होण्याची शक्यता आहे. पिरवाडी किनाऱ्यावरील बंदिस्तीचे दगड निखळू नये या करीता उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. हे निखळणारे मोठं मोठे दगड असेच कोसळत राहिल्यास पुन्हा एकदा नागाव परिसरातील शेती आणि पाण्याच्या विहिरीत खारे पाणी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचा धोका संभवत असल्याच मत नागाव मधील सामाजिक कार्यकर्ते काका पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पर्यटकांना धोका : अनेक पर्यटक समुद्रात उतरून समुद्राच्या लाटांचा आंनद घेतात. त्यावेळी एखादा दगड सरकून आल्यास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.पिरवाडी किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव : उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी या किनाऱ्याच्या विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी ३० कोटींचा निधी मिळविला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किनाऱ्यावर बाग, चालण्यासाठी मार्ग, व्यायाम साहित्य, वाहनतळ व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.